Join us  

"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 1:17 PM

Vijay Vadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आरोप केले.

 पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॅा. भगवान पवार यांची  बदली करण्यात आली होती. या बदलीच्या विरोधात मॅटमध्ये जाऊन आरोग्य मंत्री यांच्या आदेशाला आव्हान दिले. मॅटने पवार यांची पुन्हा आरोग्य प्रमुखपदी नियुक्ती केली. यामुळे आरोग्य मंत्रीसह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, आता याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक पत्र ट्विट करुन राज्य सरकारवर आरोप केले आहेत. 

"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पत्र पोस्ट करुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केले आहेत. "महायुती सरकारमध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाही त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे", असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार यांची पोस्ट काय? 

"पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ.भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावे म्हणून पत्र लिहिले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली याबाबत अनेक खुलासे करून मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत."

"आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, अँब्युलन्स घोटाळा पासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जाणते समोर आणत आहेत. या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडर साठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये", असंही वडेट्टीवार म्हणाले. 

"तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ यावी ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारएकनाथ शिंदेतानाजी सावंत