राज्यातील ग्रामपंचायती होणार हायटेक

By Admin | Updated: September 19, 2014 00:41 IST2014-09-19T00:41:31+5:302014-09-19T00:41:31+5:30

संग्राम प्रकल्प : ब्रॉडबँडने जोडल्या जाणार ग्रामपंचायती.

Hi-tech will be the Gram Panchayat in the state | राज्यातील ग्रामपंचायती होणार हायटेक

राज्यातील ग्रामपंचायती होणार हायटेक

बुलडाणा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण जनता मागे राहू नये, यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर्स नेटवर्कने ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन होणार असून, या उपक्रमांतर्गत राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती हायटेक होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने संग्राम प्रकल्पाच्या (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) माध्यमातून इ-गव्हर्नन्स, इ-पंचायत कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. यातून सर्व ग्रामपंचायती इंटरनेट सुविधेने जोडल्या; पण कामकाज आणखी गतीमान, पारदर्शक व लोकाभिमुख व्हावे, या हेतूने शासनाने पुढचे पाऊल उचलले आहे. या प्रकल्पातून ग्रामपंचायतीचे बँक खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, डिमांड ड्राफ्ट, कर्जाचे वितरण, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा विमा, आधार कार्ड, पॅनकार्ड काढणे, दप्तरी आर्थिक व्यवहार, विविध प्रकारचे १९ दाखले संगणकीकृत करणे शक्य होईल. भविष्यात रेल्वे आरक्षण, थेट लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान तसेच विविध प्रशासकीय कामांची सुविधा ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे गावातच उपलब्ध होणार आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी भारत ब्रॉडब्रँड नेटवर्क लिमीटेड कंपनी कार्यान्वित करण्यात आली आहे. स्वतंत्रपणे काम करणारी ही कंपनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे. योजना राबविण्याकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार तथा भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत.

Web Title: Hi-tech will be the Gram Panchayat in the state