लोकमत न्यूज नेटवर्कपातूर: शहरातील बाळापूर वेस परिसरात राहणारे शंकर सीताराम आमले (७०) यांचा शनिवारी उष्माघाताने मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला. शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढलेला आहे. अशातच शंकर आमले हे पातूरपासून जवळच असलेल्या खानापूर येथील शेतकऱ्याकडे कामाला होते. शनिवारी दिवसा त्यांना उन्हाचा तडाखा बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी शेतरस्त्याच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळला.या प्रकरणी पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आप्त परिवार आहे.