पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी गोपाळा जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष नरसू बेलोटे, माजी उपसरपंच विकास किसन सावंत, रामकृष्ण सर्जेराव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग बेलोटे, ज्ञानदेव बाबुराव बेलोटे, विठ्ठल रंगनाथ सरडे, अशोक विष्णू मुळे, दत्तात्रय शंकर मुळेे, जगण बेलोटे यांना पोलिसांनी घटनेनंतर तत्काळ अटक केली. एकूण १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ९ जण फरार आहेत.
या संदर्भात अशोक विष्णू मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाची सत्ता गेल्याच्या रागातून आरोपींनी एकत्र जमवून फिर्यादी अशोक मुळे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. त्यात चार जण जखमी झाले. पारनेर येथे निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर देवीभोयरे फाटा येथून देवीभोयरे गावात जात असताना, शिवाजी जाधव यांच्या घरासमोर हल्ला करण्यात आल्याचे मुळे यांनी म्हटले आहे. पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या फिर्यादीत प्रमिला सर्जेराव जाधव यांनी म्हटले की, सदर आरोपींनी रस्त्याने जाताना जाधव यांच्या घरासमोर गुलाल उधळून डीजे वाजविला. त्यांना प्रमिला जाधव या समजावून सांगण्यासाठी गेल्या असता, अशोक मुळे, विठ्ठल सरडे, तसेच विश्वनाथ गेणूभाऊ बेलोटे यांनी प्रमिला यांच्या चापट मारून धक्काबुक्की केली. यावेळी प्रमिला यांचा मुलगा सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाणही करण्यात आली. इतर आरोपींनी प्रमिला यांच्या घरावर दगडफेक करीत घरासमोरील गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.