मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचा खोटारडेपणा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:18 AM2020-12-23T04:18:44+5:302020-12-23T04:18:44+5:30
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम प्रस्तावित आहे; परंतु या मार्गावर भूमिगत गटारीचे काम सुरू असल्याने मजबुतीकरण ...
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम प्रस्तावित आहे; परंतु या मार्गावर भूमिगत गटारीचे काम सुरू असल्याने मजबुतीकरण रखडले आहे. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र मंगळवारीही या मार्गावर जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून पाइप टाकण्याचे काम सुरू होते, यावरून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
येथील स्टेट बँक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. या कामाची निविदाही मंजूर झालेली आहे; पण त्याआधी या मार्गावरील भुयारी गटारीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही दोन्ही कामे महापालिकेमार्फत करण्यात येत आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून भुयारी गटारीचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. मात्र, भुयारी गटारीचे काम गजगतीने सुरू आहे. रस्त्याच्या बाजूने भूमिगत पाइप टाकून ते एकमेकांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. रस्ता खोदल्याने या मार्गावर कमालीचा फुफाटा झाला. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा रस्ता असल्याने तो तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे आयुक्तही आग्रही आहेत; पण भुयारी गटारीचे काम काही केल्या पूर्ण होईना. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण झाल्याचे सांगून रस्त्याचे काम सुरू करण्याची सूचना केली होती. प्रत्यक्षात मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेले नसून, ते सुरूच आहे. मंगळवारी या मार्गावर जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्याचे काम सुरू होते, तसेच पुढे चर खोदून त्यात काळे पाइप टाकण्यात आले होते. त्यामुळे अर्धा रस्ताच वाहतुकीसाठी खुला असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा सपशेल खोटा असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.
....
भुयारी गटारीच्या कामामुळे नगरकर त्रस्त
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यासह शहरातील अन्य रस्ते भुयारी गटारीचे काम करण्यासाठी खोदण्यात आली आहेत. त्यामुळे मध्यवर्ती शहरातील रस्त्यांत लांबच- लांब चर खोदण्यात आले आहेत. चर खोदून ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
..
सूचना फोटो आहे.