कृषी विभागातील काम ठप्प
By Admin | Updated: August 17, 2014 00:01 IST2014-08-16T23:27:56+5:302014-08-17T00:01:48+5:30
अहमदनगर : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले़

कृषी विभागातील काम ठप्प
अहमदनगर : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे गुरुवारी (दि़१४) दिवसभर कृषी विभागातील कामकाज ठप्प झाले होते़
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ११ आॅगस्टपासून बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे़ कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जावाढीबाबत मंत्रिमंडळाने १६ जुलै २००४ रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, कृषी विभागातील योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करावा, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास १९८३ च्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी, कृषी कर्मचाऱ्यांना मारहाणीबाबत अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा, कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, कृषी पर्यवेक्षक पदे कृषी सहाय्यकातून पदोन्नतीने भराव्यात, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करावी, कृषी सेवकाची ३ वर्षाची सेवा अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरावी, पीक पेरा नोंद घेण्याचे अधिकारी कृषी सेवकांना मिळावेत, महसूल व ग्रामविकास विभागाकडून कृषी सहाय्यकांवर लादण्यात येणाऱ्या कामास प्रतिबंध करावा, कृषी सहाय्यकाचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे, रिक्त पदे तात्काळ भरावीत, आदी मागण्या महासंघाच्यावतीने करण्यात आल्या आहेत़ या मागण्यासांठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर तांत्रिक संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काम आंदोलन करुन ठिय्या दिला़ आंदोलनात शिरीष जाधव, रामदास बुचूडे, बाळासाहेब नितनवरे, शशिकांत जाधव, अशोक संसारे, एस़ जी़ दगडखैर, डी़ एस़ राऊत, शेषाराव गिरी, रामदास खांदवे, बबन डोईफोडे, जालिंदर गांगर्डे आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी)