कान्हेगाव येथे एका तळ्याजवळ सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान काही लहान मुले खेळण्यासाठी गेली होती. यापैकी चैतन्य अनिल माळी (वय १२), दत्ता अनिल माळी (८) व चैतन्य श्याम बर्डे (४) ही तीन लहान मुले खेळता-खेळता तळ्याच्या आत उतरली. पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते. त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही व तीनही मुले पाण्यात बुडाली.
तळ्याच्या वर दोन मुले बसलेली होती. त्यांनी गावात धावत जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्व गावात बातमी पसरली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
साधारणपणे पंधरा ते वीस फूट पाणी त्या ठिकाणी होते. मुले गरीब कुटुंबातील होती. चैतन्य व दत्ता ही दोघी सख्खी भावंडे होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
----
फोटो ओळी : कान्हेगाव
कान्हेगाव येथे तळ्यात तीन मुले बुडून मृत्यू पावल्याचे समजताच जमलेले ग्रामस्थ.