अहमदनगर : शहर व परिसरातील स्वच्छतेची पाहणी करताना महापालिकेचे कर्मचारीही पथकासोबत असतात. चालू वर्षी मात्र पथकाने मनपाची मदत घेतली नाही. हे पथक दुचाकीवरून शहरात फिरत असून, पथकाचा शहरातील मुक्काम वाढला आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे.
शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी नगरमध्ये दाखल झाले. मनपाचे कर्मचारी पथकाच्या दिमतीला असतात. पथकही कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन गुण देत असल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतु, चालूवर्षी मात्र पथकाने महापालिकेचे कर्मचारी सोबत घेतलेले नाही. हे पथक मंगळवारपासून शहरात पाहणी करत आहेत. शहरात एकूण १७ प्रभाग आहेत. या प्रभागांची पाहणी पथकाकडून करण्यात येत आहे. हे दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती महापालिकेला मिळाली आहे. परंतु, पथक कुठे पाहणी करते, याचा तापास मनपाच्या कर्मचाऱ्यांनाही लागलेला नाही. शहरातील कचरा संकलन, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, बांधकाम साहित्याची विल्हेवाट, नागरिकांचा प्रतिसाद, यासाठी गुण आहेत. पथक यासाठी किती गुण देतात, यावरच शहराचे मानांकन ठरणार आहे. मागील वर्षी अहमदनगर शहराचा देशात ४० वा क्रमांक आला होता. त्यामुळे नगर शहर चालू वर्षी फाईव्हस्टार मानांकनासाठी पात्र ठरले. त्यानुसार स्वच्छता विभागाने तयारीही केली हाेती. दरम्यान, घनकचरा विभाग प्रमुख नृसिंह पैठणकर हा ठेकेदाराकडून लाच घेतना पकडला गेला. त्यामुळे हे पद काही दिवस रिक्त होते. गतवर्षी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे घनकचरा विभागाचा पदभार होता. तसेच तत्कालीन आयुक्त जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपाययोजनांचा आढावा घेऊन इतर विभागांचीही मदत घेतली. स्वच्छतेसह सर्व विभागांनी एकत्रित काम केले. त्यामुळे महापालिकेला थ्री स्टार मानांकन मिळाले. तुलनेत चालू वर्षी मात्र स्वच्छतेचे नियोजन झाले नाही. त्यामुळे पथकाच्या गुणांकडे मनपाच्या नजरा लागून आहेत.
...
स्वच्छता निरीक्षकांवरच मनपाची भिस्त
घनकचरा विभागाचा प्रमुख पैठणकर लाच घेताना पकडला गेला. त्यामुळे घनकचरा प्रमुख हे पद काही दिवस रिक्त होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे घनकचरा विभागाचा पदभार देण्यात आला होता. परंतु, त्यांनी नकार दिला. प्रकल्प विभागाचे प्रमुख आर.जी. मेहत्रे यांना विचारणा झाली. परंतु, त्यांनीही नकार दिल्याने अखेर रक्तपेढीचे प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. त्यांना या विभागाचा अनुभव नाही. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकांवरच मनपाची भिस्त आहे.