कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्या प्रकरणी चौघा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती भापकर यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नावर सुरु केलेल्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते विजयराव जावंधिया, प्रकाश पोहरे, मेधाताई पाटकर, सुरेश खोपडे यांनी पाठिंबा दिला आहे.
मारुती भापकर म्हणाले, डिंबे- माणिकडोह जोड बोगद्याचे काम आणि कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांनी अटक केली पण आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहे.
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले म्हणाले, जिल्हाधिकारी यांचे कोरोनामुळे संचारबंदी जमावबंदीचे आदेश आहेत. आंदोलकांनी आंदोलन करून आदेशाचा भंग करु नये अशी नोटीस दिली होती पण त्यांनी ऐकले नाही म्हणून नाईलाजाने कारवाई करणे पोलिसांना भाग पडले.