तीसगाव : शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गतच्या गायगोठा प्रस्तावांना मंजुरी द्यावी. कार्यारंभ आदेश दिलेली रुरबनची कामे सुरू करावीत. या मागणीसाठी शिवसेनेच्या संघटक सविता ससे, आसाराम ससे यांनी बुधवारी पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलन केले. विविध गावांत रुरबन योजनेंतर्गत बंदिस्त गटार, शुद्ध पेयजल सुविधा, हायमास्ट दिवे, अशी एक कोटी रुपयांची कामे तत्काळ सुरू करून सप्टेंबरअखेर पूर्ण केली जातील, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी शीतल खिंडे, अभियंता गजानन हजारे, अनिल सानप आदींनी दिले.
त्यानंतर बैठे आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे तीसगाव येथे तीन ठिकाणी देवराई, निवडुंगे, श्रीक्षेत्र मढी, कौडगाव, निंबोडी, त्रिभुवनवाडी येथे प्रत्येकी एक ठिकाणी अशी शुद्ध पेयजल सुविधा (आरो प्लांट) लवकरच रहिवाशांना उपलब्ध होणार आहे. कासार पिंपळगाव येथे बंदिस्त गटार योजना पूर्ण झाली आहे. शिरापूर, कौडगाव, पारेवाडी, मढी, देवराई, मांडवे येथेही गटार योजना व या गावांतर्गतच्या पाणीपुरवठा योजनाही पूर्ण केल्या जातील, असे सांगण्यात आले. माजी सरपंच महादेव रहाटे, आसाराम ससे, सविता ससे यांनी चर्चेत सहभाग घेतला.