मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांनी वर्षभर सोन्याची खरेदी पुढे ढकलावी, असे आवाहन केल्यानंतर रत्न आणि दागिने उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी कॉन्सिल (जीजेसी) ने सोमवारी म्हटले. जीजेसीचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले की, थेट आणि अप्रत्यक्षपणे एक कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणारा रत्न आणि दागिने उद्योग संकटात येऊ शकतो.
३ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार
अंदाजानुसार, देशातील ज्वेलरी उद्योगाची वार्षिक उलाढाल जवळपास १० लाख कोटी रुपये आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर या उलाढालीत थेट ३० टक्के म्हणजेच सुमारे ३ लाख कोटी रुपयांची घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. केवळ ज्वेलरी शोरूम्सच नव्हे, तर या क्षेत्राशी संबंधित इतर २० पूरक उद्योगांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे व्यापारी घाबरले आहेत.
बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय), किरकोळ व्यापार, ई-कॉमर्स, ज्वेलरी डिझायनिंग, लॉजिस्टिक्स यांसारख्या अनेक क्षेत्रांवरही याचा परिणाम होईल, कारण ही सर्व क्षेत्रे रत्न आणि दागिने उद्योगाशी जोडलेली आहेत. दागिने खरेदीच काही काळ थांबली तर या सर्वांचा परिणाम एक कोटी रोजगारावर होईल. सराफा बाजार कोलमडेल. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी सराफा व्यापारी करत आहेत.
भीती : पेट्रोल पंपांवर लागल्या लांबच लांब रांगा
नवी दिल्ली : इंधन टंचाई आणि महागाईबाबत काही प्रमाणात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दागिने क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. विमान कंपन्या आणि पर्यटन क्षेत्रही दबावात होते.
सरकार म्हणते, घाबरू नका, पुरेसा साठा आहे
आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात पुन्हा एकदा 'वर्क फ्रॉम होम' संस्कृती सुरू करण्यावर चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुका संपल्यामुळेच आता इंधन बचतीच्या नावाखाली सरकार दरवाढ करणार असल्याची टीका काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केली आहे.
भारताकडे पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असून, देशात इंधन रेशनिंग करण्याची कोणतीही योजना नाही, असे पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल यांनी स्पष्ट केले. घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. भारताने ६० दिवसांचा इंधन साठा आणि ४५ दिवसांचा एलपीजी साठा सुरक्षित ठेवला आहे, असे ते म्हणाले.
गुतंवणूकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान
मुंबई : शेअर बाजार घसरून गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटींचे नुकसान झाले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८२ पैशांनी कोसळून २५.३१ रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ६०० रुपयांची घट होत ते १,५५,३०० रुपयांवर आले आहे. तर चांदीचा दर ३,७०० रुपयांनी वाढून प्रति किलो २ लाख ६५ हजार रुपयांवर पोहोचला.
गुंतवणूकदारांमध्ये पसरली घबराट
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या 'काटकसरी'च्या आवाहनामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. परिणामी, 'सेन्सेक्स' १३१३ अंकांनी कोसळून ७६,०१५ वर स्थिरावला, तर 'निफ्टी'मध्ये ३६० अंकांची मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे ६.५२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
पश्चिम आशियातील युद्धजन्य तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय गुंतवणूक सतत देशाबाहेर जात असल्याने भारतीय रुपया सोमवारी इतिहासातील सर्वात नीचांकी पातळीवर घसरला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ८२ पैशांनी कोसळून ९५.३१ रुपये प्रति डॉलरवर बंद झाला.
Web Summary : Gold industry faces crisis after PM's appeal; one crore jobs at risk. Market crashes, rupee hits record low amid global tensions. Petrol panic buying reported. Government assures sufficient fuel stocks, urges calm.
Web Summary : पीएम की अपील के बाद सोना उद्योग संकट में, एक करोड़ नौकरियां खतरे में। वैश्विक तनाव के बीच बाजार में गिरावट, रुपया रिकॉर्ड निचले स्तर पर। पेट्रोल की दहशत में खरीदारी की सूचना। सरकार ने पर्याप्त ईंधन भंडार का आश्वासन दिया, शांति बनाए रखने का आग्रह किया।