श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथील दोघा उच्च शिक्षित तरुणांनी जिरेनियम शेतीला प्राधान्य दिले आहे. एक ॲग्रो कंपनी स्थापन करून त्यांचा हा व्यवसाय वाढविण्याचा मानस आहे.
येथील तरुण कौस्तुभ त्रिंबक जगताप व भूषण सतीश कुतवळ यांनी ‘वन इसेन्स अॅग्रो’ कंपनी स्थापन केली. इतर पिकांपेक्षा दुप्पट, तिप्पट पैसे मिळवून देणाऱ्या व कमी पाण्यावर येणाऱ्या जिरेनियम या सुंगधी वनस्पतीची लिंपणगाव शिवारात पाच एकर क्षेत्रावर लागवड केली.
कौस्तुभ जगतापने अमेरिकेत इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळविली. भूषण कुतवळने एमबीए मार्केटिंगची पदवी घेतली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात दोन्ही मित्र घरी आले. त्यांनी घरूनच आपल्या कंपनीचे काम सुरू केले. त्यामध्ये फारसे मन रमत नव्हते.
शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करून पिकाला शाश्वत भाव मिळण्यासाठी कमी पाण्यावर येणाऱ्या जिरेनियम पिकाचा पर्याय स्वीकारला. अगोदर स्वत:च्या पाच एकर शेतीवर जिरेनियमची लागवड केली. ही शेती पन्नास एकरावर करण्याचा संकल्प केला. जिरेनियम पिकाचे आयुष्य हे ३ ते ५ वर्षाचे आहे. उसापेक्षा २५ टक्के कमी पाणी जिरेनियम पिकास लागते. दरवर्षी एकरी ४० ते ५० टन उत्पन्न निघते. त्यामुळे जिरेनियम शेतीमधून एकरी अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळते.
जिरेनियमचा उपयोग जिरेनियमच्या हिरव्या पाल्यापासून तेलाची निर्मिती केली जाते. या तेलाचा वापर-अत्तर, औषधे, रसायने बनविण्यासाठी केला जातो. देशभर या तेलाची भरपूर मागणी आहे. हे तेल अद्यापही आपला देश आयात करत असल्याने सरकार या प्रकारच्या शेतीला प्रोत्साहन देत आहे.
---
बदलते हवामान, पाण्याचा तुटवडा याचा अभ्यास करून आम्ही जिरेनियम सुगंधी वनस्पती शेतीचा पर्याय निवडला. शेतकऱ्यांना जिरेनियम शेतीबाबत मार्गदर्शनासाठी आमची तयारी आहे. यातून शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- भूषण कुतवळ, कौस्तुभ जगताप
काष्टी