बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:31+5:302021-07-30T04:21:31+5:30
कोपरगाव : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील बांधवांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शंभर टक्के उपस्थिती देत ...

बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ घोषित करा
कोपरगाव : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील बांधवांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शंभर टक्के उपस्थिती देत शेतकरी वर्गाकडील माल खरेदी करून जीवनावश्यक मालाचा पुरवठा केला आहे. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ घोषित करून त्यांचे लसीकरण तातडीने करावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
कोल्हे म्हणाल्या, कोरोना काळात कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रत्येक कर्मचारी व हमाल यांनी बजावलेली सेवा मैलाचा दगड ठरली आहे. या बांधवांनी त्यांच्या जिवाचा विचार केला असता, तर राज्यात सर्वत्र अवघड स्थिती निर्माण होऊन शेतीमाल तसाच खळ्यावर पडून राहिला असता, त्यातून अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते. परंतु, तसे न करता त्यांनी शेतकरी वर्गास आवाहन करून त्यांच्याकडील शेतीमाल बाजार समितीत आणून त्याचे नियोजन चांगल्या प्रकारे हाताळले आहे.