वाहन चालविताना नियम तोडला; दंड कधी भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:25+5:302021-07-08T04:15:25+5:30
अहमदनगर : महामार्ग पोलिसांनी मागील सहा महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८९ हजार ३२९ वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल ४ ...

वाहन चालविताना नियम तोडला; दंड कधी भरणार?
अहमदनगर : महामार्ग पोलिसांनी मागील सहा महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८९ हजार ३२९ वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल ४ कोटी ८३ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील अवघ्या ७ हजार ३६२ जणांनी ४० लाख ७१ हजार १०० जणांनी दंड भरला आहे. ८१ हजार ९६७ जणांकडे ४ कोटी ४३ लाख ८४ हजार रुपये बाकी आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना २०२० पासून स्पिडगणच्या माध्यमातून ऑनलाइन दंड केला जातो. विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, ओव्हर स्पीड, मोबाइलवर बोलणे, नो पार्किंग, ट्रिपल सीट, विनालायसन्स आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारला जातो. ऑनलाइन दंड झाल्यानंतर वाहनचालकांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज येतो. हा दंड ऑनलाइन तसेच महामार्ग पोलिसांच्या कार्यालयात जाऊन भरण्याची सुविधा आहे. ९० टक्के वाहनचालक मात्र दंड न भरता त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
-----------------
सर्वाधिक दंड सुसाट वाहनांना
मागील सहा महिन्यांत महामार्ग पोलिसांनी वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ३३ हजार २०० वाहनचालकांना २ कोटी ९८ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. स्पीडगणच्या माध्यमातून ऑनलाइन दंड करण्यात आला आहे. महामार्गावर अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करताना आढळून येतात. यातून अपघाताचे प्रमाण वाढते.
-----------------------
दंड न भरल्यास वाहन हस्तांतरित होणार नाही
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झालेला दंड वेळेत भरला नाही तर ते वाहन कुणालाही हस्तांतरित करता येत नाही. आरटीओ विभागातून त्या वाहनासंदर्भातील कुठलीही प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. त्यामुळे झालेला दंड हा भरावाच लागतो.
----------------------
वेगमर्यादेचे उल्लंघन -३०२०९ वाहनचालकांकडे २,९५,९७,५०० दंड बाकी
इतर नियमांचे उल्लंघन- ५१७५८ वाहनचालकांकडे १,४७,१०,९०० दंड बाकी
------------------------
महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महामार्ग पोलिसांमार्फत सातत्याने कारवाई केल्या जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून महामार्गावर १ मार्च २०२१ पासून मृत्युंजय दूत ही योजना राबविली जात आहे. नगर जिल्ह्यात पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपअधीक्षक प्रीतम यावलकर, निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत्युंजय दूत योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दंडात्मक कावाईसह प्रबोधनात्मक उपक्रमही राबविले जात आहेत.
- शशिकांत गिरी, सहाय्यक पाेलीस निरिक्षक, महामार्ग पोलीस