Ahilyanagar Crime: घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून आठवीत शिकणाऱ्या मुलाने शाळेत मधल्या सुटीत दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत विद्यार्थ्याचे वडिलांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. त्यांचा मुलगा दहावीत शिकत होता. बुधवारी सकाळी दहावीची बोर्डाची पुरवणी परीक्षा होती. शाळा दुपारी भरली. मधल्या सुटीत मुले खेळत होती.
काही डबा खात होती. त्यावेळी आठवीतील विद्यार्थ्याने शाळेच्या पोर्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याच्या पोट व डोक्यावर चाकूने वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्याला शाळेतील शिक्षकांनी तातडीने दुचाकीवर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाला. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने दोघांची नावे घेतलेली नाहीत.
अल्पवयीन आरोपी व त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेनंतर तो शाळेतच थांबून होता. त्याचे पालकही शाळेत आले होते. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
जु्न्या भांडणाचे कारण
मयताच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आपला मुलगा आपल्या सासूच्या घरासमोर क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. त्यावरून त्या परिसरातील एक कुटुंब हे नेहमी घरी भांडणासाठी येत होते.
‘तुमच्या मुलाला समजावून सांगा; अन्यथा आम्ही त्याला जीवंत सोडणार नाही,’ अशा धमक्या ते देत होते. याबाबत आपल्या बहिणीने तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये २०२४ मध्ये या कुटुंबाविरोधात तक्रारही दिली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून हा खून झाला आहे.
अभ्यासात होता हुशार
मयत मुलगा हा शाळेत अभ्यासात चांगला होता. तो खेळांत ही सहभागी असायचा. तो बुद्धिबळ ही खेळायचा असे शिक्षकांनी सांगितले. घटनेनंतर शिक्षक व संस्थाचालक ही घाबरुन गेले.