51 गोणी कांदा विकून 6 रुपये मिळाले, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 15:04 IST2018-12-07T15:11:38+5:302018-12-08T15:04:51+5:30
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५१ गोणी कांदा विकून ६ रुपये शिल्लक मिळाल्याने तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी श्रेयश संजय आभाळे यांनी ही रक्कम थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरद्वारे पाठवत सरकारचा निषेध केला.

51 गोणी कांदा विकून 6 रुपये मिळाले, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले!
घारगाव : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५१ गोणी कांदा विकून ६ रुपये शिल्लक मिळाल्याने तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी श्रेयश संजय आभाळे यांनी ही रक्कम थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरद्वारे पाठवत सरकारचा निषेध केला.
श्रेयश संजय आभाळे हे तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी असून त्यांनी दोन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी असल्याने ठिबक सिंचन करून कांदा पिकवला.
मात्र,गुरुवारी त्यांनी संगमनेर बाजार समितीत त्यातील ५१ गोण्या कांदा ( २ हजार ६५७ किलो) विक्रीसाठी पाठवला असता अवघे सहा रुपये शिल्लक राहिल्याने त्यांनी सरकारचा निषेध म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही रक्कम मनीआॅर्डर केली.
संगमनेर बाजार समितीतील आडतदाराकडे ०६ डिसेंबर रोजी कांदा विक्रीसाठी पाठविला होता. त्याचे तीन वेगवेगळे वक्कल होते. त्याचे एकूण वजन २ हजार ६५७ किलो इतके भरले.
हे घ्या हिशोब
७९५ किलो : प्रति किलोस २ रुपये ५१ पैसे
६८ किलो : प्रति किलोस ७५ पैसे
१ हजार ५९४ किलो : प्रतिकिलो ६३ पैसे
एकूण रक्कम ३ हजार २०८ रुपये ६५ पैसे
हमाली - १३९ रुपये ९० पैसे
तोलाई - १०१ रुपये ७५ पैसे
वाराई - ५१ रुपये
मोटार भाडे - २ हजार ९१० रुपये
एकूण खर्च -३ हजार २०२
३ हजार २०८ रुपये ६५ पैसे
वजा
३ हजार २०२
बाकी - ०६ रुपये फक्त