वसईतील पाण्याचे स्रोत वाचवणे गरजेचे!
By admin | Published: May 13, 2017 12:30 AM2017-05-13T00:30:17+5:302017-05-13T00:30:17+5:30
वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने
सुनील घरत।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे . नागरी भागातील नागरिकांना प्राप्त होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
वसईच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आपापल्या भागात रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करणे, उपलब्ध बावखळे व विहिरी वाचवणे ,पाण्याचे जमिनीतील संधारण वाढविणे , त्यासाठी ठिकठिकाणी व डोंगर उतारावर चर खणणे, उपलब्ध स्त्रोतातील गाळ साफ करणे अशा उपाय योजना करणे महत्वाच्या आहे . वसई उप प्रदेश हा मुंबई महानगरीलगत असल्याने येथे नागरीकिरणाचा वेग मोठा आहे. त्याच्या मानाने पायाभूत सुविधांबरोबर पाण्याची सोय ही अत्यंत महत्वाची आहे. शहरी भागासाठी महापालिकेची जलपुरवठा यंत्रणा आहे परंतु ग्रामीण भाग मात्र उपेक्षितच राहिला आहे.
याबाबतीत येथील ग्रामपंचायतींना व नियोजनबद्ध काम करावे लागेल . याच बरोबर येथील नागरिकांचेही पाण्याचा योग्य वापर कसा करावा, पाणी कमीत कमी कसे वापरावे, पाण्याची बचत कशी करावी याबाबत प्रबोधन करावे लागेल.याची सर्व जबाबदारी शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माथी मारण्याऐवजी जागरूक नागरिकांनीही आपल्या परिसरात आवश्यकती दक्षता घेऊन जनप्रबोधन केले पाहिजे. अन्यथा दरसाल प्रमाणे एप्रिल, मे व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष सहन करावे लागेल.
गेल्या वर्षी वरूण राजा आपल्यावर प्रसन्न होऊन योग्य बरसला आहे . त्यामुळे वसई उप प्रदेशातील सागरी व डोंगरी भागात पावसाळा संपल्यानंतर अजूनही काही ठिकाणचे ओहोळ वाहणे सुरु आहेत.
काही ठिकाणी सामाजिक संस्था,वनविभाग व जागरूक नागरिकांनी वनराई बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी साठवले आहे. मात्र ते प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे. ते वाढवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.
सांडपाण्याचा वापर वेगवेगळ्या संकुलातील उद्यांनांसाठी अथवा स्वच्छतेसाठी करणे, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर न करणे, बांधकामांसाठी पाण्याची कनेक्शन्स न देणे, असतील ती बंद करणे असे इलाज केले तर पाणीटंचाई तीव्रता निश्चितच कमी करता येईल. उपहारगृहे व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी टाळली तरी त्यातून मोठी पाणीबचत होऊ शकते त्या दृष्टीनेही जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.