पालखीरथाची होतेय आधुनिकतेकडे वाटचाल
By admin | Published: July 6, 2015 04:12 AM2015-07-06T04:12:05+5:302015-07-06T04:12:05+5:30
तुकोबारायांचा पालखी सोहळा आधुनिकतेशी जोडू लागला आहे. अशाच प्रकारे पालखी आणि पालखीरथ यामध्येही ठराविक कालावधीनंतर बदल होत आहेत.
मंगेश पांडे, पिंपरी
तुकोबारायांचा पालखी सोहळा आधुनिकतेशी जोडू लागला आहे. अशाच प्रकारे पालखी आणि पालखीरथ यामध्येही ठराविक कालावधीनंतर बदल होत आहेत. बैलगाडी, लाकडी रथ अन् आता चांदीचा भव्य व नेत्रदीपक अशा रथातून पालखी पंढरीला जात आहे.
तुकोबारायांचे चिरंजीव तपोनिधी नारायणमहाराज यांनी ३३० वर्षांपूर्वी पालखी सोहळा सुरू केला. नारायणमहाराज सुरुवातीला तुकोबारायांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीला जात. त्यांच्यानंतर देहूकर आणि भाविक बैलगाडीतून तुकोबारायांची पालखी पंढरीला नेत. नंतर लोखंडी रथ तयार करण्यात आला. त्यामध्ये काही वर्षे पालखी जात होती.
१९६४ च्या सुमारास सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला. यामध्ये पालखी पंढरीला जाऊ लागली. दरम्यान, १९८५ मध्ये संस्थानने जर्मन सिल्व्हर आणि चांदी यांचा रथ तयार करण्याचा निर्णय घेतला.
हा रथ तयार करण्यासाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी लागला. यासाठी कर्नाटकातून १०४ घनफूट दांडेली टिकूड हे सागवान लाकूड आणले होते. त्यात ब्रह्मा, मलेशिया आणि दांडेली टिकूड असे प्रकार असून, दांडेली टिकूड हे उत्तम दर्जाचे लाकूड समजले जाते. या लाकडावर जर्मन सिल्व्हर आणि चांदी बसवून त्यावर सुबक नक्षीकाम करण्यात आले. यासाठी २२ किलो चांदी लागली.
या रथाची बांधणी मूळचे गुजरातमधील महिसाणा येथील रमेश मिस्त्री यांच्या आजोबांनी केली. रथाची उंची ११ फूट ३ इंच होती. १९८७ ला रथाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर याच रथातून पालखी पंढरीला जात असल्याचे संस्थानाचे माजी विश्वस्त मुरलीधर पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले. उत्तम दर्जाचे टायर, ब्रेक सिस्टीम रथाला बसविण्यात आल्याने घाटमार्ग असो अथवा खडतर मार्ग, रथ व्यवस्थित चालत होता. वीस वर्षे या रथातून पालखी पंढरीला नेली जात होती.
दरम्यान, २००७ ला तुकोबारायांच्या चतु:शताब्दी जन्मसोहळ्याचे औचित्य साधून संस्थानने संपूर्ण रथ चांदीचा बनविण्याचा निर्णय घेतला. सुंदर व सुबक नक्षीकाम असावे, भव्यता असावी आदींचा विचार करून संस्थानने रथ तयार करण्याचे नियोजन केले. विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
तसेच पूर्वीच्या रथापेक्षा नवीन रथाचे वजन काही प्रमाणात कमी करण्यात आले. हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम बसविण्यात आली. २५१ किलो चांदी वापरण्यात आली. तसेच यंदाच्या वर्षीपासून रथावर ‘जीपीआरएस’ सिस्टीम बसविण्यात
येणार आहे. यामुळे पालखी सोहळा कुठे आहे, मुक्काम कुठे असेल, याबाबत भाविकांना घरबसल्या माहिती मिळू शकणार आहे.
४पादुका ठेवण्यात येणारी पालखीदेखील पूर्वी पितळेची होती. अनेक वर्षे या पालखीत पादुका ठेवून भाविक पंढरीला जायचे. १९८५ च्या सुमारास चांदीची पालखी तयार करण्यात आली. ३५ घनफूट सागवानी लाकडापासून बनविलेली पालखी प्रशस्त असून वजनालाही जड आहे.
४यासाठी ३० किलो चांदीचा वापर करण्यात आला. आषाढीवारीच्या सोहळ्यानंतर ही पालखी दर्शनासाठी मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपात ठेवलेली असते.