ट्रकचा अपघात अन् स्थानिकांनी संधी साधली; कोंबड्यांची लूट, लाखो रूपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 04:15 PM2024-02-29T16:15:56+5:302024-02-29T16:28:15+5:30

ट्रकचा अपघात होताच स्थानिकांनी गर्दी करत कोंबड्याची लूट केली.

उत्तर प्रदेशातील इटावा येथे टायर फुटल्याने ट्रकचा भीषण अपघात झाला. हा ट्रक कोंबड्याची वाहतूक करत होता. अपघात होताच स्थानिकांनी गर्दी करत कोंबड्याची लूट केली. कोणी पोत्यात तर कोणी पिशवीत भरून कोंबड्या पळवल्या.

२७ क्विंटल कोंबड्याची वाहतूक करत असलेला ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला अन् कोंबड्या जमिनीवर पडल्या. इटावा येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी दुपारी अपघात झाला. ट्रकचा टायर फुटल्याने गाडीतील कोंबड्या रस्त्यावर सर्वत्र पडल्या. मात्र, स्थानिकांनी चालकाची मदत न करता कोंबड्या पळवण्यावर भर दिला.

तासभर हा लाजिरवाणा थरार सुरू होता. ट्रक पलटल्याचे दिसताच तेथून प्रवास करत असलेल्यांनी वाहनं थांबवून कोंबड्या लंपास केल्या. काहींनी पोत्यात भरून कोंबड्या पळवल्या. सर्वकाही डोळ्यादेखत होत असतानाही आणि इच्छा असूनही चालकाला कोणालाच थांबवता येत नव्हते.

माहितीनुसार, मोहम्मद शरीफ खान ट्रकमध्ये सुमारे २७ क्विंटल कोंबड्या घेऊन कानपूरहून आग्राकडे जात होते. वाटेत अचानक ट्रकचा टायर फुटला आणि तो पलटी झाला. ट्रक उलटताच आत भरलेल्या कोंबड्या बाहेर फेकल्या गेल्या. अपघातानंतर काही मरण पावल्या तर काही जिवंत होत्या.

ट्रक चालक मोहम्मद शरीफ यांनी सांगितले की, कानपूरहून आग्राकडे जात असताना टायर फुटल्याने अपघात झाला. मग गावकऱ्यांनी आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी कोंबड्यांची लूट केली.

तसेच जवळपास एका तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. लोकांनी कोंबड्या पळवल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे, असेही ट्रक चालकाने सांगितले.