Kartiki Ekadashi 2022: सावळे सुंदर, रुप मनोहर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरपूर नगरी; पाहा, PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 10:24 AM2022-11-04T10:24:26+5:302022-11-04T10:37:13+5:30

Kartiki Ekadashi 2022: कार्तिकी एकादशीनिमित्त नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक फुलाची आरास करण्यात आली आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सापत्निक पूजा विठुरायाची पूजा केली. आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही राज्यभरातून लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला येत असतात. (kartiki ekadashi 2022)

कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. प्रबोथिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

विविध प्रकारच्या फुलांनी मंदिराचा सभामंडप तसेच मंदिर परिसर सजलेला आहे. कार्तिकी एकादशीला चार लाखांपेक्षा अधिक भाविकांची मांदियाळी होण्याची अपेक्षा आहे. वारकऱ्यांच्या मंदियाळीने चंद्रभागा वाळवंट फूलून गेले आहे.

कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे व कलावती उत्तमराव साळुंखे (रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली.

साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करता आली आहे. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते.

उत्तमराव माधवराव साळुंखे व कलावती उत्तमराव साळुंखे हे पती-पत्नी मागील ५० वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत आहेत. त्यांना दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनीही वारकऱ्यासोबत पंढरपुरात फुगडीचा फेर धरला. विठुनामाचा गजर करत वारकऱ्यांसोबत दिंडीत सहभागी झाले.

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. एकादशीनिमित्त मंदिरातील गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे.

कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. या एकादशीला प्रबोधिनी, देवउठनी अशा विविध नावांनी संबोधले जाते. यानंतर विवाहांसह अन्य धार्मिक विधींसाठी शुभ मुहुर्तांना सुरुवात होते.

भगवंताच्या रुपामध्ये फक्त पांडुरंग असे रूप आहे, की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत. पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे, की हातात शस्त्र नसले तरी त्याच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत. म्हणून तर तेथे ईश्वरी शक्ती जाणवते.

विठ्ठलाचे हे रूप शिवस्वरूप आहे. कारण त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे. ही मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रगट झाली आहे. तिथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात. व पंचामृताचाचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात.

भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली भक्तमंडळी भगवंताच्या चरणावर डोके ठेवून पदस्पर्श करतात. भगवंताचे चैतन्य सतत तिथे जाणवते. कारण ही नि:शस्त्र मूर्ती क्षमाशील आहे. तिथे गेलेल्या प्रत्येकाला मन:शांतीची अनुभूती येते.