Aditya Thackeray: सांगोल्यात गणपतरावांना अभिवादन, झाडी-डोंगारावरही बोलले ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:30 PM2022-11-09T17:30:03+5:302022-11-09T17:45:30+5:30

काय झाडी…काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओकेच.. असं म्हणणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पाहणीसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.

काय झाडी…काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओकेच.. असं म्हणणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पाहणीसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे सोलापुरात आगमन झाले असून आज बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ते सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी, त्यांनी काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

सोलापुरातील कार्यक्रमानंतर दुपारी सांगोल्यातील संगेवाडी गावातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी त्यांनी केली. याचवेळी राज्यातून बाहेर जाणाऱ्या उद्योगांवर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले.

दरम्यान, आदित्य ठाकरे सांगोला येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सूर्यफुल पिकांची पाहणी करून उत्तम शिंदे, बाळासाहेब या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना ऑगस्ट महिन्यांपासून पिके पाण्यात गेली आहे. सरसकट पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोल्यात सगळं काही ओक्के आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना पत्रकाराने विचारला होता. त्यावर, उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी एकप्रकारे नॉट ओक्के असंच म्हटलं आहे.

झाडी, डोंगर बघायला आलेलो मी, पण गुवाहटीला त्यांना तिकडचा पूरदेखील दिसला नाही. जसं तिकडचा पूर दिसला नाही, तसंच इकडची अतिवृष्टी दिसली नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, आपल्या सांगोले दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी सांगोल्याचे दिवंगत नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करुन दर्शन घतेलं.

गणपतरावजी देशमुख यांच्या सांगोला येथील रोटरी स्मृतीवनाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विधानसभेत सर्वाधिक ११ वेळा निवडून जाऊन आबांनी केलेली कामगिरी आणि निस्वार्थीपणे केलेली लोकसेवा समाजकारणातील प्रत्येकासाठी आदर्श वस्तूपाठ आहे, असेही यावेळी आदित्य यांनी म्हटलं.