२०२८ पर्यंतच नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार?; देशाच्या राजकीय परिस्थितीवर आश्चर्यकारक भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:10 PM2022-12-14T12:10:36+5:302022-12-14T12:14:48+5:30

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्तापासून तयारीला सुरुवात केली आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधकही रणनीती तयार करत आहेत. परंतु निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा यश मिळणार असल्याची भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

औरंगाबादेत राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशन आयोजन करण्यात आले होते. त्यात उपस्थित वेदमूर्ती अनंत पांडव यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भविष्य वर्तवलं आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांचेही भविष्य वर्तवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुंडलीवरून त्यांचे भाग्यस्थान हे चंद्रयुक्त असल्याने केंद्रात कुलदीपक नावाचा योग तयार झालायं. पराक्रमी शनि दशमात असल्याने मोदींची पत्रिका उच्च दर्जाची आहे. परंतु येत्या काळात मोदींना अनेक विरोधक तयार होतील असं कुंडलीवरून दिसत असल्याचं पांडव यांनी म्हटलं.

त्याचसोबत २०२४ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश मिळेल. ते पुन्हा पंतप्रधान होतील मात्र २०२८ नंतर हे पद दुसऱ्याकडे जाईल. या कालावधीत नरेंद्र मोदींच्या कुंडलीत राहुची महादशा सुरू होईल असं भाकीत वेदमूर्ती अनंत पांडव यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे मोदींनंतर पंतप्रधान होणारी ती व्यक्ती कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी देशभरात चर्चेत असून त्यांना लोकसभा निवडणुकीत किती यश मिळेल यावर सगळ्यांचे लक्ष आहे. पांडव यांच्या भाकीतानुसार, राहुल गांधींच्या कुंडलीत राजयोग आहेत. परंतु पंतप्रधानपदासारख्या उच्च पदापर्यंत ते पोहचू शकणार नाही असं भविष्य त्यांनी सांगितले.

तर अलीकडच्या निवडणुकीत भाजपाला थेट आव्हान देणाऱ्या आम आदमी पक्षाबद्दलही भाकीत वर्तवण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या कुंडलीत शुक्र, गुरू, बुध ग्रहांची दृष्टी दशम स्थानावर असल्याने त्यांना राजकीय जीवनात नवी ओळख प्राप्त होणार आहे असं सांगण्यात येते.

परंतु २०२६ नंतर केजरीवालांच्या कुंडलीची दशा बदलेल. राजकीय जीवनात त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. ते पंतप्रधान पदापर्यंत पोहचू शकणार नाहीत. इतकेच नाही तर २०२६ नंतर केजरीवाल मुख्यमंत्रीही होऊ शकणार नाहीत असं भविष्य अनंत पांडव यांनी वर्तवलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाची सत्ता आली तर देशात योगी पंतप्रधान बनतील असं राजकीय वर्तुळात सातत्याने म्हटलं जाते. परंतु योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत सूर्य, बुध ग्रहांमुळे राजयोग आहेत त्यामुळे ते मुख्यमंत्री बनले. परंतु ते पंतप्रधानपदी पोहचू शकत नाही असं वर्तवण्यात आले आहे.

योगीराज वास्तू अनुसंधानतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचा समारोप मंगळवारी झाला. यात देश व राज्यातील १४० वास्तुशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्राचे ज्योतिषी सहभागी होते. ‘निवडणुका आणि ज्योतिष’ या विषयावर अनंत पांडव यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रात मोठा बदल: आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार येईल, राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील; परंतु पक्षांतर्गत गटबाजीचा मोठ्या प्रमाणात सामना करून त्यांना त्या पदापर्यंत जावे लागेल असंही भविष्य वर्तवण्यात आले आहे.