अजमेर, पुरी व तिरुपतीला जाण्यासाठी आता वेळ कमी लागणार, 'या' वंदे भारत गाड्या सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 01:26 PM2023-09-24T13:26:45+5:302023-09-24T14:03:54+5:30

ही सेमी हायस्पीड ट्रेन इतर ट्रेनच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते.

नवी दिल्ली : देशात आज एकाच वेळी नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या लाँच करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

या नऊ गाड्या राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या 11 राज्यांमध्ये धावणार आहेत.

या नऊ नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्यामुळे देशातील अनेक प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर संपर्क सुधारेल. वंदे भारत एक्सप्रेस ही वेग आणि उत्तम सुविधांसाठी ओळखली जाते. ही सेमी हायस्पीड ट्रेन इतर ट्रेनच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधील तिरुनेलवेली-चेन्नई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.

दुसरी ट्रेन ओडिशातील राउरकेला ते पुरी दरम्यान धावेल. ही ट्रेन 505 किलोमीटरचे अंतर 7 तास 45 मिनिटांत पूर्ण करेल. सध्या या मार्गावर धावणारी सर्वात वेगवान ट्रेन सुमारे 10 तासात प्रवास पूर्ण करते.

हैदराबाद आणि बंगळुरू दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसलाही पंतप्रधान आज हिरवी झेंडी दाखवली. ही ट्रेन 610 किलोमीटरचा प्रवास 8 तास 50 मिनिटांत पूर्ण करेल. तसेच, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनही आजपासून चेन्नई ते विजयवाडा दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन 6.40 तासात प्रवास करेल.

आजपासून झारखंडमधील रांची आणि पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू होणार आहे. ही ट्रेन 535 किलोमीटरचा प्रवास 6.30 तासात पूर्ण करेल.

बिहारमधील पाटणा शहर आणि पश्चिम बंगालमधील हावडा शहर देखील आजपासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने जोडले जाणार आहे. या मार्गावर आजपासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे.

राजस्थानलाही आज आणखी एका वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळणार आहे. उदयपूरहून जयपूरमार्गे अजमेरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही आजपासून सुरू होणार आहे.

याचबरोबर, आजपासून कासरगोड-तिरुवनंतपुरम दरम्यान वंदे भारत धावण्यास सुरुवात होणार आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनच्या धावण्यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासांनी कमी होणार आहे.

गुजरातला आज आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जामनगर-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला.