हॅलो, कुठे आहात? मोदींनी परदेशात जाण्यापासून रोखलं अन् योगींचं आयुष्य बदललं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:01 PM2022-03-11T19:01:04+5:302022-03-11T19:10:43+5:30

योगी आदित्यनाथांचं भविष्य एका कॉलमुळे बदललं; योगी परदेशी जाण्याआधी मोदींनी केला होता कॉल

उत्तर प्रदेशात गेल्या ३ दशकांपासून सत्तांतराची परंपरा आहे. दर ५ वर्षांपासून उत्तर प्रदेशात सरकार बदलतं. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं ही परंपरा मोडीत काढली आणि इतिहास रचला. २०१७ मध्ये घडलेल्या एका प्रसंगानं योगींचं आयुष्य बदललं.

२०१७ पर्यंत योगी केवळ उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय होते. गोरखपूरमधून ते लोकसभेवर निवडून जायचे. त्यांना त्या भागात कोणाचाही हस्तक्षेप चालायता नाही. भाजपनं मर्जीविरोधात उमेदवार दिला तरीही ते त्याच्याविरोधात जायचे.

योगींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा फार मोठ्या नव्हत्या. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी ते परदेशी जाणार होते. केंद्रात त्यावेळी मंत्री असलेल्या सुषमा स्वराज त्यांना परदेशी जात असलेल्या शिष्टमंडळात सहभागी करू इच्छित होत्या. मात्र योगींना परदेशात जाण्यात कोणताच रस नव्हता.

विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून स्वराज यांना फोन आला. तुमच्या शिष्टमंडळातील योगी आदित्यनाथ यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली गेली नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. स्वराज यांना धक्का बसला. त्यांनी पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संवाद होऊ शकला नाही.

तुम्हाला परदेशी जाण्याची परवानगी पीएमओनं नाकारल्याचं स्वराज यांनी योगींना सांगितलं. योगी तसेही परदेशी जाण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे त्यांना वाईट वाटलं नाही. दुसऱ्याच रात्री योगींना थेट पंतप्रधान मोदींनी फोन केला आणि तुम्ही कुठे आहात याबद्दल विचारणा केली.

आपण गोरखपूरमध्ये असल्याचं योगींनी पंतप्रधानांना सांगितलं. उद्या सकाळी दिल्लीत या आणि मला भेटा, अशी सूचना मोदींनी केली. ही गोष्ट कोणालाच सांगू नका अशी ताकीदही मोदींनी दिली. दुसऱ्या दिवशी योगी दिल्लीला गेले. त्यावेळी मोदींनी त्यांना उत्तर प्रदेशचं नेतृत्त्व करण्यासंदर्भात विचारणा केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगींचं नाव जाहीर झालं, त्यावेळी अनेकांना धक्का बसला. हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार देण्यासाठी योगींची निवड झाल्याची चर्चा रंगली. मात्र पाच वर्षांत योगी मोहरा म्हणून पुढे येण्याऐवजी चेहरा म्हणू न पुढे आले. योगी भाजपसाठी ब्रँड झाला.

योगींना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता. मात्र तरीही त्यांची छाप पाडली. हिंदुत्ववादी नेता म्हणून असलेली ओळख आणखी ठळक झाली. २०१४ पासून भाजपनं सगळ्याच निवडणुकांमध्ये मोदींचा चेहरा वापरला. मात्र योगींची वाढलेली ताकद पाहता उत्तर प्रदेशात यंदा भाजपनं योगी-मोदी असे २ चेहरे वापरले.

उत्तर प्रदेशची निवडणूक आव्हानात्मक होती. मात्र भाजपनं अडीचशे जागा जिंकत सत्ता राखली. त्यात योगींचा मोठा वाटा आहे. भाजपमधलं त्यांचं स्थान आणखी बळकट झालं आहे. मोदींनंतरचा भाजपचा दुसऱ्या क्रमांकाचा चेहरा म्हणून आता योगी पुढे आले आहेत.