SSC Scam: आंघोळीला न्या, कपडे घालून द्या, डाएट सांभाळा; पार्थ चॅटर्जींचं 'वजन' ईडीला पडतंय 'भारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:19 PM2022-07-30T15:19:19+5:302022-07-30T15:30:12+5:30

शिक्षक भरती घोटाळामधील पार्थ चॅटर्जींना ईडीच्या तुरुंगात ठेवणं ईडीलाच आता महागात पडलं आहे.

पश्चिम बंगालमधील ममता सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी देशभरात चर्चेत आले आहेत. पार्थ चॅटर्जीला ईडीने अटक केली केली आणि चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee) घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे. या प्रकरणी ईडी मनी ट्रेलचा तपास करत आहे.

ईडीच्या चौकशीत अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पार्थ चॅटर्जी देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तसेच रोज ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र आता पार्थ चॅटर्जींना ईडीच्या तुरुंगात ठेवणं ईडीलाच महागात पडलं आहे.

१११ किलो वजनाच्या पार्थ चॅटर्जीसाठी आंघोळीची समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्याने ईडीच्या कोठडीत दोन दिवस आंघोळ केली नाही. कारण विचारल्यावर चटर्जी म्हणाले की, त्यांना स्वतः आंघोळ करता येत नाही आणि त्यांना विशेष स्टूलची गरज आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांच्याच कर्मचाऱ्यांच्या ग्रुपच्या एका कर्मचाऱ्याला आंघोळ करण्यास मदत करण्यासाठी बोलावले तेव्हा त्याने बाथरूम लहान असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला ईडी अधिकाऱ्यांच्या मोठ्या बाथरूममध्ये नेण्यात आले. जिथे केवळ आंघोळीसाठीच नाही तर ईडीच्या कर्मचाऱ्यांना कपडे घालण्यात पार्थ चॅटर्जींना मदत करावी लागली. त्याचबरोबर पार्थने त्यांच्या घरी अनेकवेळा स्वतः बूटं देखील घातले नाहीत. त्यांना कोणीतरी रोज बूटं घालायला मदत करायचा.

पार्थ चॅटर्जींना वजनाची समस्या आहे. चालण्यात किंवा पायऱ्या चढण्यातही त्यांना समस्या जाणवते. तसेच चॅटर्जी हे मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यामुळे ईडीने त्यांच्या आहाराची काळजी घेत त्यांना जेवणात भाताऐवजी चपाती देण्यात येत आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी यांना उद्योगमंत्री पदासोबतच इतर पदांवरूनही हटवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण विभाग, संसदीय कामकाज इत्यादी विभागातूनही कार्यमुक्त करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालच्या सरकारमधील एका मंत्र्यावर करण्यात येत असलेली कारवाई ही संपूर्ण शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये लाखो रुपयांची लाच घेऊन नापास उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.