Agni-3 Missile: भारताचा नाद करायचा न्हाय! १३ मिनिटांत बीजिंग, २.५ मिनिटांत इस्लामाबाद; अग्नि-३ मिसाइलनं शत्रुला धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:50 PM2022-11-24T14:50:55+5:302022-11-24T15:00:20+5:30

ओडिशाच्या अब्दुल कलाम व्हीलर आयलँडवर अग्नी-३ मिसाइलची चाचणी यशस्वी झाली. भारतीय लष्करात दाखल होऊन या मिसाइलला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. ही एक इंटरमीडिएट रेंजची बॅलेस्टिक मिसाइल आहे. जी अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. तसंच पारंपारिक आणि थर्मोबेरिक हत्यारांनीही हल्ला करण्याची क्षमता आहे. या मिसाइलमध्ये एकाचवेळी अनेक टार्गेट सेट केले जाऊ शकतात.

अग्नी-३ चं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मिसाइलची गती. पण त्याआधी आपण मिसाइलच्या रेंजबाबत जाणून घेऊयात. मिसाइलची रेंज ३ ते ५ हजार किमी इथकी आहे. शस्त्रांचं वजन कमी किंवा जास्त तसंच रेंजही कमी जास्त केली जाऊ शकते. ३ ते ५ हजार किमी रेंज म्हणजेच चीनचा बराचसा मोठा भूभाग, पूर्ण पाकिस्तान, संपूर्ण अफगाणिस्तान, हॉर्न ऑफ आफ्रिका, अरब देश, इंडोनेशिया, म्यानमानसारखे इतर अनेक देश या मिसाइलच्या रेंजमध्ये येऊ शकतात. म्हणजेच अग्नी-३ मिसाइल देशाच्या सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावणार आहे.

अग्नी-३ मिसाइलची गती मॅक १५ इतकी आहे. म्हणजेच १८,५२२ किमी प्रतितास आणि हा वेग खरंच प्रचंड आहे. आकडेवारीच सांगायची झाली तर ही मिसाइल एका सेकंदात ५ ते ६ किमी अंतर कापू शकते. इतकी गती म्हणजे एका क्षणात सारा खेळ खल्लास.

१७ मीटर लांबीच्या या मिसाइलचं वजन ५० हजार किलोग्रॅम इतकं आहे. ती तयार करण्यासाठी २५ ते ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 8x8 ट्रान्सपोर्टर इरेक्टर लॉन्चरनं सोडण्यात येतं.

चीनची राजधानी बीजिंग शहर भारताची राजधानी दिल्लीपासून ३,७९१ किमी इतकी आहे. अग्नी-३ मिसाइल ५-६ किमी प्रति सेकंद या गतीनं गेली तर अवघ्या १२.६३ मिनिटांत बीजिंगपर्यंतचं अंतर गाठेल. तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचं अंतर ६७९ किमी इतकं आहे. इथं तर अग्नी-३ मिसाइल अवघ्या अडीच मिनिटात हाहाकार माजवेल.

अग्नी-३ मिसाइल सह भारताकडे जितकी अण्वस्त्र आहेत. त्याबाबतची भारताची रणनिती एकदम स्पष्ट आहे. भारताकडून आगळीक केली जाणार नाही. पण शत्रुनं हल्ला केला तर त्याला जशास तसं उत्तर तातडीनं दिलं जाईल. अग्नी सीरिजच्या मिसाइलची सेकंड स्ट्राइक क्षमता वाढली आहे. अग्नी मिसाइल डीआरडीओनं विकसीत केली आहे.

अग्नी-३ मिसाइल आपल्या टार्गेटपासून ४० मीटर म्हणजेच १३० फूट दूरवर जरी पडली तरी १०० टक्के टार्गेट उद्ध्वस्त होणार इतकं नक्की. यास सर्क्युलर एरर प्रोबेबल असं म्हटलं जातं. ही मिसाइल आकाशात कमाल ४५० मीटर उंचीवर जाऊ शकते. शत्रु राष्ट्राचे सॅटेलाइट खाली पाडण्याचीही क्षमता या मिसाइलमध्ये आहे.

अग्नी-३ मिसाइलमध्ये रिंग लेजर गायरोस्कोप इनर्शियल नेविगेशन सिस्टम बसवण्यात आलं आहे. मिसाइनल हवेत असतानाच मध्येच टार्गेट बदलण्याची सुविधा यात आहे. यात मिसाइल हवेत असतानाच इन्फ्रारेड होमिंग, रडार सीन कोरिलेशन आणि अॅक्टीव्ह रडार होमिंगच्या मदतीनं शत्रुवर हल्ला करता येतो. शत्रुनं कितीही पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा मृत्यू अटळ आहे. या मिसाइलची पहिली चाचणी ९ जुलै २००६ साली झाली होती. पण त्यात यश आलं नव्हतं. मिसाइल तिच्या टार्गेटच्या आधीच कोसळली होती.

अग्नी-३ मिसाइल नुकतीच अपडेट करण्यात आली. त्यानंतर २००७ साली चाचणी घेण्यात आली. यात मिसाइलनं अचूक निशाणा साधला. अग्नी-३ मिसाइल भारताची सर्वात विश्वासार्ह आणि वेगवान मिसाइल आहे. यात अणुबॉम्ब बसवण्याचीही सुविधा आहे. तसंच शत्रुला धडकी भरवणारे थर्मोबेरिक शस्त्र देखील लावता येतात. २०१० साली देखील मिसाइलची चाचणी घेण्यात आली होती. याहीवेळी अचूक निशाणा साधला गेला होता. २०१३, २०१५, २०१७ सालीही या मिसाइलची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.