पाकिस्तानची नजरकैद, भारताने केला सर्वोच्च सन्मान; 'भारतरत्न' मिळवणारा पहिला गैर-भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 02:09 PM2024-01-20T14:09:32+5:302024-01-20T14:24:11+5:30

भारताने त्यांनाच का दिला भारतरत्न पुरस्कार, वाचा अतिशय रंजक कहाणी

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय वाद नवीन बाब नाही. १९४७च्या फाळणीपासूनच दोन देशांतील राजकीय संबंध तणावाचे आहेत. असे असताना, आज आपण एका अशा व्यक्तीबाबत माहिती घेणार आहोत ज्यांना पाकिस्तानने नजरकैदेत ठेवले, पण भारताने त्यांना 'भारतरत्न' देऊन त्यांचा गौरव केला. (Khan Abdul Gaffar Khan Bharat Ratna Story)

सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरचे हे स्वातंत्र्यसेनानी म्हणजे 'सरहद्द गांधी' नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफार खान. गांधीवादी विचारांवर विश्वास असलेले ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लढले. भारतरत्न मिळालेले आणि पाकिस्तानने नजरकैदेत ठेवलेले खान अब्दुल गफार खान यांची आज पुण्यतिथी. २० जानेवारी १९८८ ला अटकेतच त्यांचा मृत्यू झाला, पण शेवटपर्यंत त्यांनी भारतावर प्रेम केले.

६ फेब्रुवारी १८९० मध्ये आताच्या पाकिस्तानातील पेशावरमध्ये त्यांचा जन्म जाला. ते मिशनरी शाळेत शिकले आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेतला. आजोबा अब्दुल्ला खान यांच्याकडूनच अब्दुल गफ्फार खान यांना राजकीय लढ्यांचे धडे मिळाले. अलिगडमधून पदवी घेतल्यावर त्यांनी समाजसेवा करत स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली.

फक्त २० वर्षांचे असताना पेशावरमध्ये उत्मान झाई या गावी त्यांनी एक शाळा उघडली. ब्रिटिशांना ते आवडले नाही त्यामुळे १९१५मध्ये शाळेवर बंदी आली. यानंतर तीन वर्षांच्या काळात त्यांनी शेकडो गावांतील लोकांची भेट घेऊन त्यांचे प्रबोधन केले. त्यामुळेच त्यांना 'बादशाह खान' ही पदवी मिळाली.

१९१९ साली पेशावरमध्ये मार्शल लॉ लागू होता. बादशाह कान यांनी शांतता प्रस्ताव मांडल्याने त्यांना अटक झाली. ६ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर त्यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापून राजकीय चळवळ उभारली. तेव्हा १९२८ मध्ये ते गांधीजींना भेटले आणि त्यांच्या विचारांचे समर्थक बनले. त्यातूनच ते पुढे काँग्रेसचा भाग बनले.

शेवटी स्वातंत्र्यलढा यशस्वी झाल्यावर देश स्वतंत्र होण्याची वेळ आली. २० फेब्रुवारी १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. त्यातच भारतातील परिस्थिती लक्षात घेत, फाळणी हा पर्याय दिला गेला. तेव्हा बादशाह खान यांनी फाळणीला विरोध केला. फाळणी अटळ असल्याचे दिसताच, त्यांनी पश्तूनांसाठी स्वतंत्र देशाचीही मागणी पुढे केली. पण त्याचा परिणाम झाला नाही आणि फाळणीनंतर त्यांचे पाकिस्तानात घर असल्याने ते तेथे राहू लागले.

स्वातंत्र्यानंतरही त्यांचा लढा सुरूच राहिला आणि पाकिस्तानमध्ये बादशाह खान पश्तूनांच्या हक्कांसाठी लढत राहिले. अनेक वर्षे तुरुंगात राहिले. एकूण ९८ वर्षे जगलेले बादशाह खान यांनी तब्बल ४२ वर्षे तुरुंगात घालवली. त्यांच्या आंतरराष्ट्रीय सक्रियतेमुळे १९६७ मध्ये जवाहरलाल नेहरू पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. १९७० मध्ये ते भारतात आले आणि दोन वर्षे राहिले. या काळात त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि पाकिस्तानात परतले.

१९८७ मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आणि हा सन्मान मिळवणारे ते पहिले अभारतीय ठरले. त्यानंतर २० जानेवारी १९८८ रोजी पेशावरमध्ये बादशाह खान यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते पाकिस्तानच्या नजरकैदेत होते. जन्मभर अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या बादशाह खान यांच्या अंत्ययात्रेत मात्र दोन स्फोट झाले, त्यात १५ जणांना प्राण गमवावे लागले.