PHOTOS: श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर सापडलेल्या बोटीचे फोटो आले समोर, काय-काय सापडलं?; कशी दिसते पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 03:31 PM2022-08-18T15:31:39+5:302022-08-18T15:38:05+5:30

मुंबईजवळील रायगडमध्ये श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एका स्पीडबोटीत एके-४७ रायफल्स आणि जीवंत काडतुसं आढळल्यानंतर संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनाऱ्यावर ही बोट आल्यानंतर स्थानिकांनी याचे फोटो काढले आणि पोलीस प्रशानासाला माहिती दिली आहे. या बोटीचे फोटो आता समोर आले आहेत.

मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला कुणीही विसरू शकत नाही. या हल्ल्यात अनेक निष्पाप मुंबईकरांचे जीव गेले. समुद्रामार्गे बोटीतून १० पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले त्यानंतर त्यांनी शहरात रक्तपात घडवला होता. आता रायगडच्या श्रीवर्धन हरिहरेश्वर समुद्रकिनारी २ निनावी बोट आढळल्या आहेत. बोटीत ३ एके-४७ आढळल्यानं खळबळ माजली आहे.

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या आहेत. बोटींमध्ये ३ एके ४७ आणि २२५ राऊंड्स, कॉन्फरन्स टेबल, कॅम्प्युटर आढळले आहेत. काही ग्रामस्थांनी बोट काढण्याचा प्रयत्न केला. काही एके-४७ बंदुका आढळून आल्या आहेत. नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असं बोटीवर लोगो आहे. पोलीस तपास करत आहेत.

सध्या पोलीस या संशयास्पद बोटीबाबत तपास करत आहेत. परंतु या घटनेमुळे महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. राज्यात समुद्र किनारी जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून मुंबईतही ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यात त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन प्रशासनाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट यूकेत रजिस्टर्ड आहे. यूकेतील एका कंपनीच्या नावावर ही बोट आहे. त्याची पडताळणी पोलिसांनी केली आहे. त्याचसोबत २ व्यक्तींबाबत पोलिसांना कळालं आहे. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. या दोन्ही व्यक्ती इंडोनेशियाच्या नागरिक असल्याचं पुढे आलं आहे. तसेच एका ऑस्टेलियन नागरिकाबाबतही काही कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत.

या घटनेनंतर मुंबईच्या महत्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करुनच सोडलं जात आहे. श्रीवर्धनला आढळलेल्या या संशयास्पद बोटीच्या घटनेनंतर राज्याचे एटीएस प्रमुख विनित अग्रवाल त्यांच्या एका टीमसह श्रीवर्धनला तातडीनं रवाना झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार राज्याच्या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बोटीवर काही ISO कोड आणि स्टिकर्सही आढळून आले आहेत. याची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगडचा समुद्रकिनारा याआधीपासूनच संवेदनशील राहिला आहे. १९९३ मध्ये रायगड जिल्ह्यात दिघी व शेखाडी बंदरात एके ५६ बंदुका व आरडीएक्सचे साठे उतरविण्यात आले. त्यानंतर १२ मार्च, १९९३ रोजी मुंबईतील शेअर बाजार, एअर इंडिया इमारत, सेंचुरी बाजार, प्लाझा सिनेमा, नायगाव, विमानतळ प्रवेशद्वार आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात २५७ जण ठार झाले होते. त्यामुळे इतिहास पाहता राज्याचं पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे.

पोलिसांनी हत्यारांचा साठा जप्त केला. कागदपत्रे ताब्यात घेतली. पोलिसांनी तात्काळ या बोटीबाबत नौदल गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली. ऑन रेकॉर्ड ही बोट यूकेची असल्याचं आढळलं. त्याचसोबत मेरिटम सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपनीचं स्किटर एके ४७ च्या बॉक्सवर होते. त्यामुळे ही बोट नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदिती तटकरे यांनी केली आहे.