यापुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावरच लढणार; जनआशीर्वाद यात्रेत भाजपचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:02 PM2021-08-21T16:02:10+5:302021-08-21T16:12:57+5:30

महापालिकाच काय आता यापुढील प्रत्येक निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढण्याचा नारा भाजपाने दिलेला आहे. त्यामुळे स्वबळावर प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू आहे. लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुका देखील स्वबळावरच लढवू. असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांत जाऊन तेथील विकासकामांबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात जाण्याच्या निमित्ताने लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब, शेतकरी, मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्या योजनांचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचला की नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहिले जाईल.असेही डॉ. कराड म्हणाले

जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाड्यातील ७ लोकसभा मतदारसंघात गेलो. त्या भागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यात्रेला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे देखील त्यांच्या मतदारसंघात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत वेगळी असून त्यांनी जनसामान्यांपर्यंत योजना गेल्या आहेत की नाही, हे पाहण्यासाठी यात्रा काढण्याचे आदेशित केले.

राज्य सरकार काहीही कामाकरिता केंद्राकडे वारंवार बोट दाखवित असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री डॉ.कराड यांनी केला. हे सरकार काही करीत नाही. कोविडच्या काळात एकही व्यापक अशी योजना आणली नाही. केंद्र शासनाने अनेक योजना तयार करून त्या अंमलात आणल्या.

कोरोना प्रतिबंधक लसपुरवठा, पहिल्या व दुसऱ्या लाटेत सामान्यांसाठी अन्नधान्य पुरवठा, कोरोना रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी प्लांट दिले. देशाची लसीकरण मोहीम जगभरात नावाजली गेली. एकंदरीत जनकल्याणासाठी पंतप्रधान मेहनत घेत असल्याचे डॉ. कराड म्हणाले.

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने डाॅ. कराड केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच औरंगाबादेत आले होते. जनआशीर्वाद यात्रेचा समारोप शनिवारी कन्नड येथे होत आहे.