बनावट कॉल सेंटरवरील छाप्यात दोघांना अटक

By admin | Published: June 27, 2017 11:05 PM2017-06-27T23:05:34+5:302017-06-27T23:05:34+5:30

बोगस कॉल सेंटरवर येथील गुन्हे शाखेच्या (सायबर सेल) पथकाने छापा घातला. हे कॉल सेंटर चालविणाऱ्या बिहारमधील सूत्रधारांसह दोघांना पोलिसांनी अटक केली.

Both arrested on fake call center raids | बनावट कॉल सेंटरवरील छाप्यात दोघांना अटक

बनावट कॉल सेंटरवरील छाप्यात दोघांना अटक

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालणाऱ्या बल्लारपुरातील (जि. चंद्रपूर) बोगस कॉल सेंटरवर येथील गुन्हे शाखेच्या (सायबर सेल) पथकाने छापा घातला. हे कॉल सेंटर चालविणाऱ्या बिहारमधील सूत्रधारांसह दोघांना पोलिसांनी अटक केली.

प्रवीणकुमार वाल्मिकीप्रसाद (वय ४४) असे या रॅकेटच्या सूत्रधाराचे नाव असून तो बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील ग्राम संगत (अलीनगर) येथील रहिवासी आहे. त्याच्यासोबतच पोलिसांनी त्याचा नातेवाईक अरुण विनोद त्रिवेदी (वय ३२) यालाही अटक केली असून, तो उत्तर प्रदेशातील ग्राम भोजपूर (सिरैनी, जि. रायबरेली) येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडून आतापावेतो नागपूर, नाशिक, मुंबई, गोवा आणि अमदाबादसह देशातील हजारो तरुणांना गंडा घालण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या (आर्थिक शाखा, सायबर सेल) उपायुक्त श्वेता खेडकर यांनी पत्रकारांना मंगळवारी सायंकाळी ही माहिती दिली. यावेळी सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात भूमिका वठविणारे सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने उपस्थित होते.

उपायुक्त खेडकर यांच्या माहितीनुसार, सूत्रधार प्रवीणकुमार हा अभियंता (बीई) असून, रोजगाराच्या निमित्ताने बबिहारमधून सात ते आठ वर्षांपूर्वी चंद्रपुरात आला. प्रारंभी तो एसएनडीएलमध्ये कंत्राटी पद्धतीने आधार कार्ड डिजिटलायझेनचे काम करू लागला. नंतर त्याने नवनवीन रोजगार केले आणि डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालण्याचा गोरखधंदा सुरू केला.
वृत्तपत्रातून जाहिरातबाजी
उपायुक्त खेडकर यांच्या माहितीनुसार, सूत्रधार प्रवीणकुमार हा अभियंता (बीई) असून, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालण्याचा गोरखधंदा डिसेंबर २०१६ मध्ये सुरू केला. त्यासाठी त्याने बल्लारपुरात एक सदनिका भाड्याने घेतली. येथे नऊ बेरोजगार तरुणींना त्याने कॉल अटेंड करण्यासाठी आणि कॉल करणाऱ्यांना प्रतिसाद देण्यासाठी नोकरीवर ठेवले. बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो वृत्तपत्रातून जाहिरात देत होता. या जाहिरातीत तो रोजगारासाठी संपर्क करण्याचे आवाहन करीत होता. त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन येताच तो संबंधित बेरोजगारांना आॅनलाईन कागदपत्रे मागवून घ्यायचा. त्यानंतर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर २० हजार रुपये महिन्यांपर्यंतची नोकरी देण्याचे आमिष दाखवायचा. तसे शपथपत्रही त्यांना करून द्यायचा. नागपुरातील नवीन शशिधरन या तरुणाने संपर्क करताच आरोपीने त्याला सुपरवायजरची नोकरी देतो, असे म्हणून त्याला डाक्युमेंटेशन करिता बँक आॅफ महाराष्टच्या ६०२७२२ ०५८९६ मध्ये ४५०० रुपये जमा करण्यास सांगितले. दोन आठवड्याच्या आत नोकरी मिळेल, अशी हमी दिल्यामुळे नवीनने आपल्या ओळखपत्रासह शैक्षणिक कागदपत्रे मेल करून ४५०० रुपयेही आरोपी प्रवीणकुमारने सांगितलेल्या खात्यात जमा केले. मात्र, तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही त्याला नोकरी मिळाली नाही. आरोपीचा मोबाईल क्रमांकही स्वीच्ड आॅफ येत होता. नोकरी तर मिळाली नाही, पैसे गेले आणि फसवणूकही झाल्यामुळे नवीनने गुन्हे शाखेत त्याची तक्रार नोंदवली. अशाच प्रकारच्या चार तक्रारी पुन्हा गुन्हे शाखेकडे आल्या. त्यामुळे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चौकशी सुरू केली. तक्रारकर्ते वेगवेगळे असले तरी त्यांची फसवणूक सारख्या पद्धतीनेच झाली होती. या सर्वांनी पोलिसांना दिलेली कागदपत्रे (पुरावे) एकसारखीच असल्याने सायबर सेलच्या माध्यममातून तपास सुरू करण्यात आला असता देशभरातील बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्यांचे रॅकेटच पोलिसांच्या हाती लागले. हे रॅकेट देशभरातील विविध प्रांतात राहणाऱ्या बेरोजगार तरुणांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने यांच्या नेतृत्वात सायबर तक्रार निवारण केंद्राचे (सी-३) प्रशांत भरते, उपनिरीक्षक मयूर चौरसिया, हवालदार संतोष ठाकूर, संतोष मदनकर, अमित भुरे, राहुल धोटे, क्रिष्णा इवनाते आदींच्या पथकाने शनिवारी २४ जूनला बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील विद्यानगर वॉर्डातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या या बनावट कॉल सेंटरवर छापा घातला. यावेळी तेथे मुख्य सूत्रधार प्रवीणकुमार बाल्मीकीप्रसाद, त्याचा नातेवाईक अरुण त्रिवेदी आणि त्यांनी कॉल सेंटरवर कर्मचारी म्हणून ठेवलेल्या नऊ तरुणी आढळल्या. पोलिसांनी तेथून तीन संगणक, एक लॅपटॉप, एक प्रिंटर, शासकीय (बनावट) कागदपत्रे, रजिस्टर, १९ सीमकार्ड, १५ मोबाईल फोन आणि १ लाख ६ हजार ८०० रुपयांची रोकड तसेच दुचाकी असा एकूण २ लाख ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
--
बिहार, उत्तर प्रदेशमध्येही बँक खाती
बेरोजगारांनी नोकरीच्या आशेने संपर्क करताच आरोपीच्यावतीने कॉल करणाऱ्या मुली त्यांना विशिष्ट बँक खाते क्रमांक सांगून त्यात बेरोजगारांना रक्कम जमा करण्यास सांगत होते. त्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा आणि महाराष्ट्र बँकेत खाती उघडली होती. महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही आरोपींनी बँक खाती उघडून बँकांचीही फसवणूक केली आहे. या बँक खात्यात विविध ठिकाणच्या बेरोजगारांनी जमा केलेली अंदाजे १० ते १२ लाखांची रोकड आरोपींनी गेल्या सात महिन्यात उचलल्याचे उघड झाले आहे.
---
२४०८ बेरोजगारांशी संपर्क
आरोपींनी केवळ विदर्भ, महाराष्ट्र नव्हे तर गोवा, अहमदनगरसह देशातील विविध प्रांतात राहणाऱ्या एकूण २४०८ तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याच्या नोंदी आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये पोलिसांना आढळल्या आहेत. त्यातील सर्वाधिक बेरोजगार नाशिक (११०) त्यापाठोपाठ पुणे (१०८) आणि नंतर नागपुरातील (१०६) आहे.
या बनावट कॉल सेंटरच्या जाळ्यात ४२ शहरातील बेरोजगारांची नावे पोलिसांना मिळाली. पीडित बेरोजगारांच्या शहरांची नावे आणि संख्या पुढील प्रमाणे आहेत.
जळगाव (९४), अहमदाबाद (७५), सोलापूर (७५), कोल्हापूर (६४), अकोला (४३), औरंगाबाद (३५), अहमदनगर (३२), जालना (२७), ठाणे (२४), नांदेड (२२), बुलडाणा (१६), अमरावती (०६), बीड (११), भंडारा (०२), भुसावळ (०३), चंद्रपूर (०७), धुळे (२०), सातारा (२१), सांगली (१९), परभणी (१६), लातूर (१५), उस्मानाबाद (१४), वाशिम (१०), यवतमाळ (१०), वर्धा (०८), गोंदिया (०६), हिंगोली (०६), रायगड (०५), गडचिरोली (०४), नंदूरबार (०४), मुंबई (०३), पनवेल (०३), पैठण (०२), गोवा (०२) कल्याण (०१), रत्नागिरी (०१), सिंधूदुर्ग (०१),मिरत (१) आणि पालघर (०१). मात्र, यातील केवळ २५ पीडितांच्या तक्रारीच पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यातील नवीन शशिधरन, श्वेता कांबळे, हर्षल पिंपळे आणि कृष्णकुमार शिवाणे याच्या तक्रारीवरून या रॅकेटचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
---
सी थ्री ची पहिलीच कारवाई धडाकेबाज
पोलीस आयुक्तांनी मे महिन्यात सायबर सेलमध्ये सी थ्री (सी-३) ही शाखा सुरू केली. या शाखेची ही पहिलीच धडाकेबाज कारवाई आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान कौशल्य विकास योजना असो अथवा कोणतीही दुसरी शासकीय योजना, त्या योजनेतून बेरोजगारांना रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडून शुल्क घेतले जात नाही तर त्यांना मानधन दिले जाते. आरोपी प्रवीणकुमार मात्र बेरोजगारांकडून रक्कम घेत असल्याचे तक्रारकर्त्यांनी सांगताक्षणीच हा बनवाबनवीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. मात्र, आरोपींनी ज्या क्रमांकावरून पीडितांशी संपर्क केला होता, ते सीम आरोपींनी पूर्णत: बंद केले होते. तरीसुद्धा पोलिसांनी शिताफीने आरोपींपर्यंत पोहचून त्यांच्या मुसक्या बांधल्या. दरम्यान, अशा प्रकारे कुणी रोजगाराच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा कुणाची फसवणूक झाली असेल तर गुन्हे शाखेसोबत संपर्क करावा, असे आवाहनही शेवटी उपायुक्त खेडकर यांनी केले.

Web Title: Both arrested on fake call center raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.