उसनवारीवर पाणी घेऊन शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:13 PM2019-06-05T12:13:47+5:302019-06-05T12:23:38+5:30

१५0 म्हशी-वघारींचा संसार जीवापाड जपण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

Swimming pool for the buffalo; constructed by the farmer by taking loan | उसनवारीवर पाणी घेऊन शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

उसनवारीवर पाणी घेऊन शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळामुळे दुग्धव्यवसाय अडचणीतचारा-पाण्याचा खर्च कैक पटींनी वाढला

- विजय पाटील

हिंगोली : मुलांप्रमाणेच गुरांनाही जिवापाड जपणारे शेतकरी अजून असल्याने तोट्याचा म्हटला जात असला तरी शेतीव्यवसाय सुरू आहे. हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथील किशनराव मांडगे यांनी दुग्धव्यवसायासाठी उसनवारीवर पाणी घेऊन म्हशींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जलतरण तलाव भरला.

यंदा हिंगोलीत तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. गुरांचे चारापाणी करणे अवघड बनले आहे. जलस्त्रोत झपाट्याने आटत आहेत. मांडगे यांचीही १00 फूट खोल विहीर आटली. कयाधू नदीत घेतलेला एक बोअर अर्धा तास चालतो. त्यात म्हशींची तहानही भागत नाही. मग त्यांचा जलतरण तलाव भरण्याचा प्रश्न होता. शेजारच्या एका शेतकऱ्याकडून पाणी घेऊन ही निकड भागविली. दिवसा चारा-पाणी केल्यानंतर दुपारी या तलावात सोडायचे. सायंकाळी शेडमध्येच तुषाराप्रमाणे थंड फवारे अंगावर पडणारी यंत्रणा आहे. ती मध्यरात्रीपर्यंत चालवावी लागते. तिला कमी पाणी लागते. दर दोन ते तीन दिवसांनी तरण तलावातील पाणी बदलावे लागते. हे पाणी शेडमधील मलमुत्रासह तेथे आलेले असल्याने ते चारा पिकांना गाळून सोडले जाते. त्यामुळे पीकही चांगले येते. शिवाय म्हशी तलावातून धुवून बाहेर निघण्यासाठीच्या खास व्यवस्थेला रोज पाणी लागते. हजारो लिटर पाण्याची ही गरज भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ही व्यवस्था न केल्यास म्हशींना उन्हाळ्यात तग धरणेच कठीण असते. प्रसंगी त्यांच्या जिवाचीही भीती. त्यामुळे म्हशींना जपायचे व दुग्धव्यवसाय करायचा तर एखादे वर्ष असे म्हणून मांडगे यांनी संगोपनात कुठलीच कसर ठेवली नाही. याशिवाय कडबा कुट्टी, कडबा व दूध वाहतुकीची वाहने, वीज नसल्यास पर्याय म्हणून दोन जनरेटर, दूध साठविण्यास फ्रीजर तसेच लाखोंचा खर्च करून उभारलेले शेड, जलतरण तलाव व म्हशींना फिरविण्यासाठीचे संरक्षक भिंतीसह मैदान या वेगळ्याच बाबी. व्यवसाय करताना हळूहळू हे निर्माण केली तरीही तेही सांभाळावेच लागते. त्याचबरोबर सात ते आठ सालदारही शेतीसह या कामावर जुंपलेले असतात. घरचे किशनराव मांडगे यांच्या चार मुलांचे कुटुंबही इतर कामे सांभाळून यात राबते. तिसरी पिढीही झटत आहे. यात सर्वाधिक वाटा बाजीराव मांडगे यांचा. तर अशोक, सुभाष मांडगे हेही शेतीतील इतर कामांत मदत करतात. सर्वांत थोरले रामेश्वर हे मार्गदर्शन व इतर व्यवहार सांभाळतात.

१५0 म्हशी-वघारींचा संसार 
मांडगे यांच्याकडे म्हशी व वघारी मिळून १५0 आहेत. यापैकी म्हशी ९0. त्यातील ७५ टक्के दुभत्या. मात्र पाण्याअभावी बेताचाच चारा मिळाला. येलदरी येथील २५ एकर ऊस विकत घेतला. आतापर्यंत ३00 टन ऊस खाद्य म्हणून लागला. ३ हजार रुपये प्रतिटन त्याचा भाव आहे. सोबतीला तीन हजार रुपये क्विंटलचे ढेप आदी पशुखाद्य. दरवर्षीपेक्षा यंदा दरही वाढले. घरचा चाराही नाही. त्यामुळे हरभरा, टाळकीचे कुटारही विकतच घेतले.

खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ अवघड
बाजीराव मांडगे म्हणाले, वडिलांनी अडीच एकर जमीन व एका म्हशीवर दुग्धव्यवसाय सुरू केला. आज कुटुंबाची ९५ एकर जमीन आहे. दीडशे म्हशी आहेत. कुठल्याही अनुदानावर नव्हे, तर कुटुंबाच्या मेहनतीवर हे उभे राहिले. यामुळेच आमची ओळख निर्माण झाली. त्यामुळे हे पशुधन जिवापाड जपलेच पाहिजे. यंदा दुष्काळ नसता तर पाचशे लिटर दूध विक्री करता आली असते. मात्र अशाही परिस्थितीत साडेतीनशे लिटरच्या आसपास दूध मिळते. खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ अवघड झाला. मात्र या पशुधनासाठी जे करतोय ते कमीच आहे. कामाला असलेली माणसंही जपायची आहेत. एखादे वर्ष असेही. म्हणून कुणापुढे हात थोडी पसरता येणार आहे. यंदा दुष्काळामुळे आपल्याच भागात अनेक ठिकाणी गुरांना चाराही मिळत नाही. त्यांच्या पशुधनाचे हाल होत आहेत. ते बघवत नाही. शासनाने त्यांच्यासाठी तरी चारा छावण्यांची सोय केली पाहिजे. 


पशुधन टिकवावे लागेल 
पशुधनामुळेच शेतीत प्रगती करता येते. त्यांच्या मलमुत्रामुळे शेतीचे उत्पादन चांगले येते. शिवाय रसायनमुक्त असते. दुग्धव्यवसायातून जोडधंदाही होतो. चांगले करायचा प्रयत्न केला. यश मिळत गेले. आता हे पशुधन टिकवावेच लागेल. दुष्काळात माणसांना कुठेही जाता येईल. या मुक्या प्राण्यांची तर आपणच काळजी घेतली पाहिजे. 
- किशनराव मांडगे 

Web Title: Swimming pool for the buffalo; constructed by the farmer by taking loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.