दुचाकी पुलाला धडकल्याने जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू, औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील शिवना नदीवर झाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:20 PM2017-10-27T18:20:33+5:302017-10-27T18:29:43+5:30
मोटारसायकल पुलाच्या कठड्याला धडकून त्यावरील दोन तरुण नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाले.
हतनूर ( औरंगाबाद) : मोटारसायकल पुलाच्या कठड्याला धडकून त्यावरील दोन तरुण नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाले. हि घटना औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टापरगावच्या शिवना नदीवरील पुलावर आज पहाटे घडली.
प्रकाश विठ्ठल बर्डे (२३) व श्याम किसन भगत (२२, रा. माळीवाडा, दौलताबाद) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र एम.एच. २० -सीपी-७८४८ या क्रमांकाच्या मोटारसायकलने कन्नडहून औरंगाबादकडे पहाटे तीनच्या सुमारास जात असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व पुलाच्या कठड्याला धडकून दोघेही पुलाखाली नदीपात्रात पडून जागीच गतप्राण झाले. शिवना नदीपात्रात पाणी नसल्याने दोन्ही तरुणांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी ७ वाजता नजरेस पडले. घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक रोहित बेंबरे यांनी दोघांचे मृतदेह हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले. पुढील तपास बेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जयंत सोनवणे हे करीत आहेत.
माळीवाडा येथे अंत्यसंस्कार
दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी माळीवाडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश व श्याम जीवलग मित्र होते. दोघेही सोबत राहायचे. काल ते कन्नडला मित्राला भेटण्यासाठीच गेले होते. परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. आज दिवसभर माळीवाडा कडकडीत बंद ठेऊन गावक-यांनी मयत दोन्ही तरुणांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रकाश हा आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील मिस्तरी काम करतात. मयत प्रकाशच्या पश्चात आई-वडील व एक बहिण असून श्यामच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. दोन्ही तरुणांची घरची परिस्थिती साधारण आहे. प्रकाश हा मामाच्या मोबाईल शॉपीमध्ये माळीवाडा येथेच काम करायचा. श्याम हा वाळूज महानगरातील एका कंपनीत काम करायचा. त्यांच्या अपघाती मृत्यूने माळीवाड्यावर शोककळा पसरली आहे.