तळोधी परिसरात धानाची डबल फसल
By Admin | Published: February 11, 2016 01:24 AM2016-02-11T01:24:05+5:302016-02-11T01:24:05+5:30
धानाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत, शेती करणे परवडत नाही. तरीही नागभीड तालुक्यातील सावरगाव, गिरगाव या परिसरात धानाची दुसरी फसल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे.
परिस्थितीवर शेतकऱ्यांची मात : विहिरींमुळे झाली सिंचनाची सोय
घनश्याम नवघडे नागभीड
धानाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत, शेती करणे परवडत नाही. तरीही नागभीड तालुक्यातील सावरगाव, गिरगाव या परिसरात धानाची दुसरी फसल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. खरोखरच या शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम करण्याजोगी ही बाब आहे.
प्रादेशिकतेच्या दृष्टीने नागभीड तालुक्याचे दोन भाग केले जातात. एक नागभीड आणि दुसरा तळोधी. घोडाझरी तालावाच्या रुपाने तळोधी भागाला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने हा भाग तसा सुपीकच म्हणूनच संबोधल्या जाते. या भागात धानाचे उत्पादन नागभीड भागापेक्षा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. पण प्रत्येक गोष्टीच्या वाढलेल्या किंमती वातावरणामुळे धानाला सतावणारे विविध रोग आणि दिवसेंदिवस धानाचे घटत चाललेले भाव या विविध कारणांमुळे तळोधी भागातीलही शेतकरी त्रस्त झाले आहेत.
असे असले तरी या सर्व संकटांवर मात करुन तळोधी भागातील सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा या परिसरात शेतकऱ्यांनी धानाची दुसरी फसल घेतली आहे. या दुसऱ्या फसलसाठी मागील महिन्यातच पऱ्ह्याची पेरणी केली. आता हे पऱ्हे रोवणी योग्य झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवातही केली आहे. सदर प्रतिनिधीने या भागास भेट दिली असता, सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरात अनेक शेतात रोवणी सुरु असल्याचे दिसून आले. त्यातल्या त्यात सावरगाव येथे तर दुसऱ्या फसलचे प्रमाण अधिक असल्याचे एका शेतकऱ्यांने सांगितले.
धान पिकास पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहीरी आणि विधन विहिरींची सोय उलब्ध केली आहे. या विहिरी अािण विंधन विहिरीच्या भरवश्यावरच हे शेतकरी धानाचे दुसरे पकी घेत आहेत. धानाला भाव जरी कमी असले तरी या दुसऱ्या हंगामाने त्यांच्या आर्थिक थैर्याला मदत होत आहे.
३५० ते ४०० एकरवर डब्बल फसल
तळोधी भागातील सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरात जवळपास ३५० ते ४०० एकरामध्ये धानाचे दुसरे पीक घेतले जात आहे. या दुसऱ्या पिकामुळे त्या परिसरातील मजुरांना रोवणी आणि कापणीच्या रुपाने रोजगारही उपलब्ध झाला आहे.
आमच्या कुटुंबात लहान मोठे ४० सदस्य आहेत. आमचे एकत्र कुटुंब असून शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. आम्ही जवळपास ३५ एकरामध्ये धानाचे दुसरे पीक घेत आहोत. रिकामे बसण्यापेक्षा आम्हीशेतीत गुंतून राहतो. शेती सुद्धा चांगली राहते. आर्थिक फायदाही होतो. कुटुंबातील व्यक्तीही कामात व्यस्त राहतात.
- गणपत ठिकरे, शेतकरी,सावरगाव
जिथे जिथे सिंचनाची सोय उपलब्ध आहे, तिथे तिथे हे उन्हाळी पीक घेतले जाते. सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरा व्यतिरिक्त तालुक्यातील इतर गावातही उन्हाळी लागवड केली जाते. धानासोबतच इतर पीकही शेतकऱ्यांनी घ्यावे.
- आर. एन. पठाण, तालुका कृषी अधिकारी, नागभीड