औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचे बिल चार दिवसांत भरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:50 AM2018-03-24T00:50:23+5:302018-03-24T00:51:50+5:30
महापालिका प्रचंड आर्थिक संकटातून जात असताना शुक्रवारी वीज वितरण कंपनीने जोरदार शॉक दिला. थकबाकीचे ४ कोटी रुपये चार दिवसांमध्ये भरा अन्यथा पाणीपुरवठ्याची वीज तोडण्यात येईल, असा इशारा सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिका प्रचंड आर्थिक संकटातून जात असताना शुक्रवारी वीज वितरण कंपनीने जोरदार शॉक दिला. थकबाकीचे ४ कोटी रुपये चार दिवसांमध्ये भरा अन्यथा पाणीपुरवठ्याची वीज तोडण्यात येईल, असा इशारा सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला. महावितरणच्या या नोटीसमुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले आहेत. तिजोरी रिक्त असताना एवढी मोठी रक्कम भरायची कशी, असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे.
मनपाच्या तिजोरीत अक्षरश: खडखडाट आहे. चार दिवसांपूर्वीच प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी स्थायी समितीत मनपाच्या खात्यात निधी नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. या परिस्थितीतसुधारणा झालेली नसताना शुक्रवारी महावितरणने थकबाकीपोटी तगादा लावला आहे.
पाण्याच्या सर्व टाक्यांची वीज कापणार
चालू महिन्याचे दोन कोटींहून अधिक बिल भरल्यानंतरही महावितरण थकबाकीचे ४ कोटी भरा, अशी मागणी करीत आहे. पैसे न भरल्यास जायकवाडीपासून औरंगाबाद शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची वीज खंडित करण्यात येईल, असेही कंपनीने नमूद केले आहे. महावितरणच्या या पवित्र्यामुळे मनपा अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. तिजोरीत चार कोटी तर सोडाच चार लाखही शिल्लक नाहीत. एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची, असा प्रश्न लेखा विभागाच्या अधिकाºयांना पडला आहे.