नेताजीनगरातील रॅन्चोची कमाल, बनविली ई सायकल; १०० किलोमीटरची रेंज, बॅटरीची वॉरंटीही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 17:01 IST2023-02-10T16:39:40+5:302023-02-10T17:01:13+5:30
फक्त २० हजारांचा खर्च

नेताजीनगरातील रॅन्चोची कमाल, बनविली ई सायकल; १०० किलोमीटरची रेंज, बॅटरीची वॉरंटीही
यवतमाळ : तुम्ही वापरत असलेली सायकल एक चांगली ई-बाइक बनू शकते हे स्वप्न वास्तवात उतरले आहे. यवतमाळ शहरातील नेताजीनगर झोपडपट्टीत वाढलेल्या रॅन्चोने आपल्या चिकित्सक बुद्धीतून आविष्कार तयार केला आहे. सायकलसह केवळ २० हजारांत त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. आता त्याच्याकडे एक महिना पुरेल एवढ्या ई सायकलची ऑर्डर आलेली आहे. ३० ते ४० किमी प्रति तास इतका स्पीड, एका चार्जिंगमध्ये १०० किलोमीटरची रेंज ही या ई सायकलची खासियत आहे.
चिकित्सक बुद्धी व प्रयोगशील वृत्ती असेल तर आजूबाजूची परिस्थिती काय याला फारसे महत्त्व राहत नाही. नेताजीनगरमध्ये राहणाऱ्या दोन भावांनी एक नवा पर्याय यवतमाळकरांपुढे ठेवला आहे. ब्रॅन्डेड कंपनीच्या ई बाइकपेक्षाही दमदार अशी ई सायकल त्यांनी तयार केली आहे. घरात भंगारात पडलेली सायकल दुरुस्त करून तिचाही ई सायकल म्हणून वापर करता येतो. कौशिक राजेंद्र शेलोटकर याने अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्यूमिटेशनची पदवी घेतली आहे. तर त्याचा लहान भाऊ श्री राजेंद्र शेलोटकर हा विधी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. या भावंडांचे वडील राजेंद्र शेलोटकर हे मूर्तिकार आहेत. तर आई सुवर्णा ही गृहिणी आहे.
मातीतून मूर्ती घडविण्याचा गुण या दोघाही भावंडांना वडिलांपासून मिळाला. अभियांत्रिकीच्या कौशिकने ई सायकलचे डिझाइन तयार केले, तर श्री नेही यावर काम सुरू केले. पाच दिवसांच्या परिश्रमातून ई सायकल तयार केली. त्यानंतर त्यांनी परिसरातील अनेकांना अशा सायकली तयार करून दिल्या आहेत. आता तर त्याच्याकडे महिनाभर पुरेल इतका काम येऊन पडले आहे. कौशिक हा उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू आहे. शिवाजी व्हॉलिबॉल क्लबकडून तो खेळतो.
गरिबांसाठी ई सायकल
अतिशय कमी पैशात ई सायकल तयार होते. बॅटरी व मोटरची वॉरंटी असल्याने किमान दोन वर्षे तरी कुठलाही खर्च येत नाही. सायकललाच मोटार बसवून बॅटरीवर चालविता येते. त्यात त्याने दोन मोड दिले आहेत. डिस्क ब्रेकमुळे वेगावर नियंत्रण ठेवता येते. सायकललाच मोटार बसवून बॅटरीवर चालविता येते. त्यात त्याने दोन मोड दिले आहेत. डिस्क ब्रेकमुळे वेगावर नियंत्रण ठेवता येते.
अल्ट्रा चार्जर वापरून घरातच ई सायकल चार्ज करता येते. तीन तासांत पूर्णत: चार्ज होते. १०० किमीची रेंज असल्याने किमान यवतमाळात चार दिवस ई सायकल पुन्हा चार्ज करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे खरेदी किमतीसोबतच याच्या वापराचा खर्चही अतिशय कमी आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठीही फारसा खर्च लागत नाही.