लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील टॉवर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्याम मारोती गायकवाड यांनी यवतमाळातील जिल्हाधिकारी कार्यालयात वीरूगिरी आंदोलन केले. नोंदणी कार्यालयाच्या मागे असलेल्या टॉवरवर पहाटेच श्याम जाऊन बसला. दुपारी १२.३० च्या दरम्यान प्रशासनाच्या आश्वासनानंतर तो खाली उतरला.दिग्रस पोलिसांनी श्याम विरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. राजकारण्यांच्या दबावात पोलीस कारवाई करीत आहे. या सर्व गुन्ह्यांची फेरचौकशी व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन श्यामचे आंदोलन सुरू होते. या शिवाय दिग्रस तालुक्यातील काठी येथे उच्च प्राथमिक मराठी शाळेची शेती आहे. या शेतावर यशवंतराव साळुंके यांनी अतिक्रमण केले आहे. ही जमीन शासनाने परत घेऊन गोरगरिबांना वाटून द्यावी, अशी मागणी श्याम गायकवाड यांनी केली. टॉवरवर कुणीतरी चढले याची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, नायब तहसीलदार अजय गौरकार, आपत्ती निवारण पथक, अग्निशमन दल, शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्यामसोबत संपर्क करण्यासाठी त्याच्याकडे मिनी लाऊडस्पीकर पाठविण्यात आला. नंतर त्याने आपल्या मागण्यांचे निवदेन खाली टाकले. त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानंतर दुपारी १२.३० श्याम खाली उतरला. त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मंगळवारी दिवसभर या आंदोलनाची यवतमाळ शहरात चर्चा होती. आंदोलन ठिकाणीही तोबा गर्दी झाली होती.