महानगरातून परतलेल्या लेकरांमुळे गावखेडे फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:05+5:30
रोजगारासाठी गावातील अनेक जण मुंबई, पुणे या महानगरात स्थिरावलेले आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातच रोजगारासाठी प्रत्येकाचे जाणे-येणे असते. यामुळे गावात वृद्ध व्यक्तीच वास्तव्याला आहे. गेल्या १५ वर्षात गावांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात जाणवतो. यातूनच शेतीला लागणारे मनुष्यबळ मिळत नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनमुळे महानगरातील मोठमोठे कारखाने, लहान उद्योग धंदे, बांधकाम ठप्प झाले आहे. रोजगाराच्या शोधात या नगरात स्थिर झालेले अनेक जण आपल्या गावी परतले आहे. पूर्वी म्हातारेच गावातच थांबत होते. तरुणवर्ग अपवादानेच गावी येत होता. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला २० वर्षापूर्वीच्या वैभवाची जाणीव होत आहे. आई-वडिलांच्या चेहºयावर मुलगा, नातू घरी आल्याचे समाधान दिसत आहे.
रोजगारासाठी गावातील अनेक जण मुंबई, पुणे या महानगरात स्थिरावलेले आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातच रोजगारासाठी प्रत्येकाचे जाणे-येणे असते. यामुळे गावात वृद्ध व्यक्तीच वास्तव्याला आहे. गेल्या १५ वर्षात गावांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात जाणवतो. यातूनच शेतीला लागणारे मनुष्यबळ मिळत नव्हते.
त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच मजूर टंचाई जाणवत होती. कोरोनामुळे बहुतांश कुटुंबातील रोजगारासाठी बाहेर पडलेले मुले घरी परतले आहेत. अशा कुटुंबामध्ये सणाचा सारखा आनंद पहायला मिळतो. एकाकी गावात असणाºया वृद्धांना आता नातवंडाचाही सहवास लाभत आहे.
२० वर्षापूर्वी गावांमध्ये हे चित्र पहायला मिळत होते. गावातील शेतकरी असो की शेतमजूर यांचे घर भरल्या सारख्या दिसत होते. सर्वच जण शेतमजुरीची कामे करून गुण्यागोविंदाने राहत होते. मात्र नंतरच्या पिढीच्या गरजा वाढल्या, रोजगाराच्या शोधात अनेक जण घराबाहेर पडले. त्यामुळे गावात वडीलधारी मंडळीच वास्तव्याला होती.
कोरोनाचा असाही फायदा
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाला. पाहता पाहता संपूर्ण जगच ठप्प झाले. अशा स्थितीत आपसुकच अनेकांनी आपले गाव व घर गाठले. बऱ्याच वर्षानंतर गावात आल्याने त्यांनाही वेगळा आनंद मिळत आहे. काहींनी तर शेतातील कामाला जुंपून घेतले आहे. सध्या शेतात मशागतीसह रबीच्या पिकांची काढणी सुरू आहे. बहुतांश गावांमध्ये पाण्याच्या उपलब्धेनुसार उन्हाळी पिकाचीही लागवड झाली आहे. आता शेतमजूर मिळत असल्याने शेतकºयांनीही शेताच्या बांधबंदिस्तीसह इतर कामे काढली आहे. लॉकडाऊनचा असाही फायदा गावातील कुटुंबांना झाल्याचे दृश्य पहायला मिळते.