एसटीचा प्रवास महागला ! स्वच्छतेसाठी प्रवाशांकडूनच घेतले जातील दोन रुपये शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:06 IST2026-04-08T19:06:05+5:302026-04-08T19:06:59+5:30
Yavatmal : एसटी बस, बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची महामंडळाची ऐपत नाही, असे अप्रत्यक्ष मान्य करत यासाठीच्या खर्चाचा भार प्रवाशांवरच टाकण्यात आला आहे.

ST travel has become expensive! Two rupees will be charged from passengers for cleanliness
विलास गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटी बस, बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची महामंडळाची ऐपत नाही, असे अप्रत्यक्ष मान्य करत यासाठीच्या खर्चाचा भार प्रवाशांवरच टाकण्यात आला आहे. प्रत्येक तिकिटामागे आता दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महामंडळाच्या गंगाजळीत या मार्गाने दररोज एक कोटी दहा लाख रुपयांची भर पडणार आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत एसटीची कायम बोंबाबोंब राहिली आहे. धुळीने माखलेल्या सीट्स, पान-खर्राच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले बस, बसस्थानकाचे कोपरे, खाद्यपदार्थांचे रिकामी पाकीटे हे चित्र सर्रास दिसते. शिवाय एसटी बस बाहेरूनही भरलेली असते. बसस्थानकाच्या परिसरात साचून असलेला कचरा, मुतारीची अनियमित स्वच्छता यामुळे दुर्गंधी पसरली असते. वास्तविक ही कामे एसटीला मिळणाऱ्या उत्पन्नातून करणे गरजेचे असताना त्याचा भुर्दंड प्रवाशांवर टाकला जात आहे.
एसटीकडे सफाई कामगारांची वानवा असल्याने स्थानिक पातळीवर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली जाते. त्यांची सेवा अपेक्षेप्रमाणे दर्जेदार नाही, अशा तक्रारी असल्याचे कारण पुढे करत महामंडळाने स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पेशल बसकरिता ५० रुपये
प्रासंगीक कराराकरिता एसटी बस बुक करणाऱ्या व्यक्तीकडून अधिभाराच्या नावाखाली प्रतिबस ५० रुपये आकारले जाणार आहे. शिवाय, आवडेल तेथे प्रवास, पासधारक प्रवासी यांच्याकडून प्रत्येकी पाच रुपये घेण्यात येणार आहे. या माध्यमातून सातून एसटी महामंडळाने उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधला असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. एसटी स्वच्छ राहावी म्हणून प्रवाशांवर भुर्दंड का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दररोज ५५ लाख प्रवाशांची वाहतूक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज ५५ लाख नागरिक प्रवास करतात, असे एसटीकडून सांगितले जाते. एका प्रवाशाकडून दोन रुपये म्हणजे ५५ लाख प्रवाशांकडून एक कोटी दहा लाख रुपये वसूल होणार आहे. अधिभाराच्या या रकमेतून राज्यभरातील २५१ आगार आणि ५९८ बसस्थानके स्वच्छ ठेवले जाईल, असा दावा केला जात आहे.