Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 09:07 IST2025-06-23T09:07:16+5:302025-06-23T09:07:52+5:30
कापूस, मूग, उडीद, ज्वारीच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह : मराठवाड्यात धुवांधार, विदर्भ माघारला

Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण
- रूपेश उत्तरवार, यवतमाळ
बदलत्या हवामानाचा परिणाम थेट मान्सूनवर झाला आहे. वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने काही भागाला झोडपून काढले, तर राज्यातील काही भाग अजूनही कोरडाच ठेवला. यामुळे जूनअखेरपर्यंत राज्यात केवळ २२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहे. दरवर्षी मराठवाड्याला पावसाची वाट पाहावी लागायची. यावर्षी विदर्भातील जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यातून कापूस, मूग, उडीद, ज्वारीचे क्षेत्र घटण्याचा धोका वाढला आहे.
संपूर्ण राज्यात एक कोटी ४० लाख हेक्टरवर खरिप पेरण्या होतात. यातील निम्मे अधिक क्षेत्र जूनपर्यंत पेरणीखाली येते. यावर्षी संपूर्ण राज्यात केवळ २२ लाख हेक्टरवर खरिप पेरण्या झाल्या आहेत.
त्यात मराठवाड्याचे क्षेत्र जास्त आणि विदर्भाचे क्षेत्र जेमतेम आहे. गत १० वर्षांचा अभ्यास केला तर पेरणी होण्याचा कालावधी लांबत चालला आहे. सोबतच परतीचा पाऊस वाढत चालला आहे. यावर मात करण्यासाठी बियाण्यामध्ये संशोधन होणे गरजचे आहे.
विदर्भातील कापसाचा पेरा घटण्याचा धोका
पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली, तर दुसरीकडे विदर्भात १५ ते २० जूनपर्यंत पावसाने ओढ दिली. यानंतर पाऊस पुन्हा थांबला आहे. यात कापूस लागवडीचा कालावधी २० जूनपर्यंत योग्य होता. विदर्भात सर्वाधिक १२ ते १५ लाख हेक्टरवर कापूस होतो. यावर्षी विदर्भात पाऊस लांबल्याने कापसाचा पेरा घटण्याचा धोका आहे.
मूग, उडीद लागवडीचा कालावधी उलटून गेला
मूग आणि उडीद लागवडीचा कालावधी संपला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पेरणी न जमल्यामुळे. मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.
मूग, उडीद लागवडीचा कालावधी उलटून गेला
मूग आणि उडीद लागवडीचा कालावधी संपला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पेरणी न जमल्यामुळे. मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.
हवामान बदलाने हे घडत आहे. या वर्षी विदर्भात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. धानाच्या पेरण्या जुलैमध्ये होतील, अशी स्थिती आहे, तर मराठवाड्यात पूर येत आहेत. - सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
मुंबई : राज्यात पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने उंच लाटांचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली असून, दरड हटविण्याचे काम सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.