नेरच्या कापूस उत्पादकांची यवतमाळात अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:26+5:30
नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कापूस विक्रीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक त्रासही होत आहे. एवढेच नाही तर खराब असल्याचे कारण सांगत दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. यवतमाळ येथे खरेदी केंद्रावर अवहेलना होत असल्याची ओरड नेर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.
१ जुलैपासून यवतमाळ येथील केंद्रांवर नेरमधील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू झाला. मागील पाच दिवसात ४८० शेतकऱ्यांचा कापूस यवतमाळ येथील खरेदी केंद्रावर घेण्यात आला. याठिकाणी अवहेलना होत आहे. चांगला कापूसही खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहनातील दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. कापूस खराब असल्याचे कारण सांगत हा प्रकार होत आहे. या केंद्रावर दररोज केवळ ३० गाड्या कापूस खरेदी होत आहे. संबंधित यंत्रणेकडून फोन करून गाडी मोजणीचा नंबर लागल्याची सूचना केली जाते.
शेतकरी आपला संपूर्ण कापूस विक्रीसाठी यवतमाळ येथे घेऊन जातो तेव्हा त्यांना मनमानीचा अनुभव येत आहे. खरेदी केंद्रावरील कर्मचारी मनमानी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. आधीच कापूस विक्रीला उशीर झाला आहे. शेतीकामासाठी पैशाची गरज आहे. आहे तेवढा कापूस विकून यासाठी तजवीज केली जात आहे. त्यातही खरेदी केद्रांवर मनमानी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहे.
वणीतही विकला कापूस
नेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वणी येथील खरेदी केंद्र देण्यात आले होते. घरात कापूस पडून राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी ३०० किलोमीटर अंतर जाणे-येणे करून कापूस विकला. यात त्यांना प्रवास भाड्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
नेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या पद्धतीने कापूस खरेदी करावी. यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
- भाऊराव ढवळे, सभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती, नेर