काँग्रेसमध्ये प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर! बुधवारपासून तालुकाध्यक्ष मुलाखती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:53 IST2025-06-03T13:51:36+5:302025-06-03T13:53:13+5:30

दाभडी ते आर्णी: यवतमाळमध्ये शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आजपासून

Congress's in-charge rule is on the verge of ending! Taluka president interviews begin from Wednesday | काँग्रेसमध्ये प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर! बुधवारपासून तालुकाध्यक्ष मुलाखती सुरू

Congress's in-charge rule is on the verge of ending! Taluka president interviews begin from Wednesday

विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
मागील अनेक वर्षापासून राज्यातील 30 जिल्ह्यांत प्रभारी अध्यक्षांमार्फत काँग्रेसचा कारभार सुरू आहे. हे प्रभारीराज लवकरच संपणार आहे. पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष निवडीसाठी उद्या, बुधवार ४ जूनपासून मुंबईत टिळक भवन येथे मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच मुलाखती घेऊन अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे.


पक्षाची धुरा स्वच्छ प्रतिमा आणि रोखठोक शैली तसेच संघटनेत जनाधार असलेल्यांकडे सोपविण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मानस आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची अध्यक्षपदी अनपेक्षितपणे निवड करून त्यांनी याची सुरुवात केली. सपकाळ यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकाची नेमणूक केली होती. या पक्षनिरीक्षकांनी संबंधित जिल्ह्यात जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता या जिल्ह्यातील अहवाल पक्षश्रेष्ठींकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, बुधवारपासून मुंबई येथे तालुकाध्यक्ष निवडीसाठी मुलाखती होणार असून, तसे निरोप संबंधित पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. 


राज्यात काँग्रेसचे ६० जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, तब्बल ३० जिल्हाध्यक्ष हे प्रभारी आहेत. काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षाची नियुक्ती प्रदेश अध्यक्षांच्या शिफारसीने थेट दिल्लीहून काँग्रेस अध्यक्षांमार्फत होते. मात्र, मागील काही वर्षात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीऐवजी प्रदेश स्तरावरून प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमून कामकाज सुरू होते. हे प्रभारी तसेच ज्या जिल्ह्यात पक्षनिरीक्षकांना संघटनात्मक उणिवा आढळल्या, अशा ठिकाणाचा आढावा घेऊन नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रदेश पातळीवर रणनीती सुरू आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसने मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात पदाधिकारी निवडीसाठी 'संघटन सृजन अभियान' हा नवा पॅटर्न आणला आहे. थेट दिल्लीहून बड्या नेत्याची निरीक्षकपदी नेमणूक करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्ष निवडला जात आहे. हीच पद्धत महाराष्ट्रातील नियुक्तीवेळी वापरली जाण्याची शक्यता काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली. प्रदेश कार्यकारिणीचीही साफसफाई करण्यात येणार आहे. जनतेत सक्रिय नसलेल्या मात्र कार्यकारिणीत वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेल्या १८ ते २० उपाध्यक्ष तसेच ७० ते ७५ सचितांची उचलबांगडी होऊ शकते, असे ते म्हणाले.


यवतमाळमध्ये आज शेतकरी सन्मान पदयात्रा

  • प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त्ती झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जाण्यावर भर दिला आहे. मस्साजोग ते बीड अशी स‌द्भावना यात्रा काढली. त्यानंतर परभणी ते पोखर्णी यात्रा झाल्यावर परळीमध्ये सद्भावना सत्याग्रह केला.
  • बेळगावसह नांदेडमध्ये तिरंगा रॅली काढली. रामनवमीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नातवाला सोबत घेऊन पुजाऱ्यांना थेट संविधानाची प्रत दिली. या उपक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसला उभारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
  • आता मंगळवार ३ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यात दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा ते काढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी येथे २० मार्च २०१४ रोजी 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम घेतला होता.

Web Title: Congress's in-charge rule is on the verge of ending! Taluka president interviews begin from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.