शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचा भाजपला विसर : सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:35 IST2025-06-04T12:32:32+5:302025-06-04T12:35:14+5:30
Yavatmal : काँग्रेसची दाभडी ते आर्णी शेतकरी सन्मान पदयात्रा

BJP has forgotten the 16 promises made to farmers: Sapkal's criticism
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी (यवतमाळ): २०१४ मध्ये दाभडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासह तब्बल १६ आश्वासने दिली होती. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या ११ वर्षात यापैकी एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केलेले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळेच आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करून देण्यासाठी काँग्रेसतर्फे दाभाडीतील ओंकारेश्वर मंदिरापासून ही पदयात्रा निघाली.
यात्रेत गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिस अहमद, वसंत पुरके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार राजेश राठोड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आर्णी येथे पदयात्रेचे मेळाव्यात रूपांतर झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, या घोषणांचे काय झाले? यातील एक तरी घोषणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पूर्ण केली का? असा सवाल करीत हे सरकार केवळ धनाड्या उद्योगपतींचे असल्याचे ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात शेतकरी, शेतमजूर समाधानी होता, यावर त्यांनी जोर दिला.
माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, असा सवाल सरकारला केला. ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, सर्वसामान्यात सरकारच्या कारभाराबाबत प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप सरकारला केवळ उद्योगपतींची काळजी
- राज्यातील शेतकऱ्यांचे आज प्रचंड हाल सुरू आहेत. हरभरा, कापूस, सोयाबीन, तुरीसह कांद्याला भाव नाही.
- सोयाबीनला ३५ ते ४० रुपये किलो भाव असताना सोयाबीन तेलाची किंमत मात्र १६५ रुपये लिटरवर गेली आहे. हा मधला मलिदा उद्योगपती खात आहेत.
- भाजपने 'हर घर तिरंगा अभियान राबविले. मात्र, त्यासाठी चीनमधून पॉलिस्टरचे झेंडे मागविल्याची टीका करीत शेतकरी, शेतमजुरांच्या हक्काची लढाई काँग्रेस यापुढेही लढत राहील, अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.