पोलिसांच्या चुकीमुळे खुनातील कुख्यात आरोपींना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST2021-10-02T05:00:00+5:302021-10-02T05:00:34+5:30

पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. अक्षय टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. यवतमाळच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. दरम्यान, अक्षय गँगविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र या गडबडीत ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलीस विसरले.

Bail granted to notorious accused in murder due to police misconduct | पोलिसांच्या चुकीमुळे खुनातील कुख्यात आरोपींना जामीन

पोलिसांच्या चुकीमुळे खुनातील कुख्यात आरोपींना जामीन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील स्टेट बँक चौक परिसरात कुख्यात अक्षय राठोड टोळीने त्याचा जावई करना परोपटे याची गोळ्या झाडून हत्या केली. सायंकाळी वर्दळीच्या वेळेस हे हत्याकांड घडले. या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना अटक केली. मात्र नंतर गुन्ह्याचा तपास वेळेत केला नाही. न्यायालयात दोषारोपपत्रही नव्वद दिवसांत सादर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने सहा कुख्यात आरोपींना जामीन मंजूर केला.
अक्षय राठोड टोळीने बाभूळगाव तालुक्यातील वर्धा नदीकाठावर रेतीचे साम्राज्य उभे केले. वर्चस्वाच्या लढाईतून अक्षय राठोड याने स्वतःच्याच बहीण-जावयाचा खून घडवून आणला. मोक्का अंतर्गत अक्षय राठोड औरंगाबाद कारागृहात असताना त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने करण परोपटे याची हत्या घडवून आणली, अशी तक्रार करणची पत्नी तथा अक्षय राठोडची बहीण हिने पोलिसांत दिली. 
त्यावरून पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. अक्षय टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. यवतमाळच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. दरम्यान, अक्षय गँगविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. 
मात्र या गडबडीत ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलीस विसरले. याचाच फायदा कुख्यात आरोपींना मिळाला. आरोपींनी ९० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर २३ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत कुठलीही हालचाल केली नाही. मात्र नंतर थेट अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपींच्या वकिलांनी दमदार युक्तिवाद केला. 
यामुळे न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. पोलिसांकडून आरोपींविरोधात मोक्काची प्रक्रिया करण्यात येत असतानाच न्यायालयाकडे रीतसर अर्ज करून दोषारोपपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागणे अपेक्षित होते. मात्र ही प्रक्रिया नियमानुसार झालीच नाही. नेमका याच चुकीचा फायदा आरोपींना मिळाला. त्यांना तीन महिने पूर्ण होताच गंभीर गुन्ह्यात जामीन मंजूर 
झाला. 

भक्कम पुरावे असूनही पोलिसांनी कच खालली
- सर्वांसमक्ष हे हत्याकांड घडले. शिवाय गोळीबारात एक हॉटेल व्यावसायिकही जखमी झाला होता. भक्कम पुरावे हातात असताना पोलिसांच्या चुकीमुळे आशिष उर्फ बगीरा रमेश दांडेकर, शुभम हरिप्रसाद बघेल, दिनेश उर्फ अमित मधुकर तुर्काने, धीरज उर्फ बँड सुनील मैद, हृषीकेश उर्फ रघू दिवाकर रोकडे, प्रवीण उर्फ पिके कवडू केराम हे आरोपी कारागृहाबाहेर आले आहेत. गंभीर बाब म्हणजे मोक्का अंतर्गत औरंगाबाद कारागृहात असलेला मास्टर माईंड अक्षय राठोड यालासुद्धा प्रोडूस वॉरंटवर पोलिसांनी करण हत्याकांडात चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही. यामुळेच गंभीर गुन्हे शिरावर असलेले आरोपी कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.

 

Web Title: Bail granted to notorious accused in murder due to police misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.