पुनरूज्जीवीत पाणीपुरवठा योजनांतर्गत ६७ गावांना पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 15:25 IST2018-07-22T15:24:22+5:302018-07-22T15:25:23+5:30
६७ गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरूज्जीवीत करण्यात आल्याने लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

पुनरूज्जीवीत पाणीपुरवठा योजनांतर्गत ६७ गावांना पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील बंद पडलेल्या उंबर्डाबाजार ९ गावे, म्हसणी १६ गावे, दुबळवेल-३ गावे, जऊळका रेल्वे-३ गावे, वनोजा-४ गावे, चांडस-६ गावे, चिचांबाभर-४ गावे, भामदेवी-६ गावे यासह वार्ला ८ गावे आणि करडा ८ गावे, अशा ६७ गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरूज्जीवीत करण्यात आल्याने लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासनाने ३१ डिसेंबर २०१६ च्या अध्यादेशानुसार जिल्ह्यातील करडा, उंबर्डाबाजार, म्हसणी आणि वारला या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पुनरूज्जीवनास मंजूरात देवून ५ कोटी ३१ लाख ७१ हजार रुपये निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दिला होता. यासह ९ फेब्रूवारी २०१७ च्या अध्यादेशानुसार, भामदेवी, चांडस, दुबळवेल, जऊळका रेल्वे, वनोजा आणि चिचांबाभर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी ८ कोटी ८० लाख २६ हजार ३०० रुपयांचा निधी देण्यात आला. त्यातून सदर योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासोबतच पुढील देखभाल-दुरूस्ती, संचलन व संनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्विकारून सर्व ठिकाणची कामे पूर्ण केली आहेत. सद्या नळ पाणीपुरवठांकरिता आवश्यक असलेले पाणी देखील उपलब्ध असल्याने संबंधित सर्व गावांना पुरेसे पाणी पुरविले जात असल्याची माहिती मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी दिली.