वाशिममध्ये अवकाळी पाऊस; पिकांचं मोठं नुकसान
By संतोष वानखडे | Updated: February 15, 2024 18:31 IST2024-02-15T18:27:28+5:302024-02-15T18:31:26+5:30
२०२३ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदरच शेतकरी गारद झालेला आहे. त्यानंतरही नोव्हेंबर-डिसेंबरला अवकाळी पाऊस झाल्याने तूर, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

वाशिममध्ये अवकाळी पाऊस; पिकांचं मोठं नुकसान
वाशिम : जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगावसह अन्य भागात गुरूवार, १५ फेब्रुवारीला दुपारी ३:३० ते ४:३० वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस झाल्याने हरभरा, गहू, भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले.
२०२३ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदरच शेतकरी गारद झालेला आहे. त्यानंतरही नोव्हेंबर-डिसेंबरला अवकाळी पाऊस झाल्याने तूर, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. आता पुन्हा ढगाळ वातावरण आणि गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस झाल्याने सोंगून ठेवलेला हरभरा, गहू तसेच सोंगणीला आलेल्या गहू, हरभऱ्याचे नुकसान झाले. वाशिम शहरासह ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली.
बाजार समितीतील शेतमाल भिजला
दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस आल्याने वाशिमसह अन्य बाजार समित्यांच्या आवारात ओट्याखाली ठेवलेला शेतकऱ्रयांचा शेतमाल भिजला. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई संबंधित प्रशासनाने करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.