खरेदीदार-हमाल यांच्यातील वाद मिटला; रिसोड बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:31 IST2020-03-03T17:31:25+5:302020-03-03T17:31:40+5:30
आठ दिवसांपासून बंद असलेली रिसोड बाजार समिती ३ मार्चपासून पूर्ववत झाली आहे.

खरेदीदार-हमाल यांच्यातील वाद मिटला; रिसोड बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : खरेदीदार आणि हमाल-मापारी यांच्यातील वादावर २ मार्च रोजी पडदा पडल्याने, गत आठ दिवसांपासून बंद असलेली रिसोड बाजार समिती ३ मार्चपासून पूर्ववत झाली आहे.
बाजार समितीमध्ये सीसीटिव्ही बसविणे, शेतमाल मोजणी, अडत व अन्य कारणावरून रिसोड बाजार समितीमधील खरेदीदार आणि हमाल-मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. या वादामुळे गत आठ दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार पूर्णत: ठप्प होते. बाजार समिती बंद असल्याने शेतकºयांचे व्यवहारही ठप्प झाले होते. या वादावर पडदा टाकण्यासाठी २ मार्च रोजी बाजार समितीचे सचिव विजय देशमुख, रिसोड नगर परिषदेचे माजी अध्यक्ष यशवंत देशमुख, नगर परिषद सदस्य नारायण गायकवाड, माजी नगरसेवक प्रल्हादराव गायकवाड यांनी खरेदीदार आणि हमाल-मापारी यांची बैठक बोलाविली होती. यावेळी रिसोड व्यापारी संघातर्फे पुरुषोत्तम तोष्णीवाल, गोपाल काबरा, किशोर कोठुळे तर हमाल मापारी संघटनेतर्फे बंडूभाऊ उटकर, श्रीराम पवार, रामचंद्र बुधकरे, दीपक सोनुने, शेख पाशु, कैलास शिंदे, विष्णू खंदारे आदींची उपस्थिती होती. यावेळी खरेदीदार आणि हमाल-मापारी यांच्यामध्ये योग्य तोडगा काढण्यात आला. त्यामुळे ३ मार्चपासून बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत झाले.