वृक्षदिंडीच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे आवाहन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 18:49 IST2018-06-30T18:47:40+5:302018-06-30T18:49:13+5:30
वाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली.

वृक्षदिंडीच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे आवाहन!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून वृक्षदिंडीला सुरूवात झाली. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरणचे उपविभागीय वनाधिकारी के. आर. राठोड, सहाय्यक वनसंरक्षक अशोक वायाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, आर.पी. कांबळे, वनपाल भोसले, धर्माळे आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथून वृक्षदिंडीला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिव्हील लाईन्स मार्गे वन वसाहत येथे आल्यानंतर वृक्ष दिंडीचा समारोप करण्यात आला. या वृक्ष दिंडीमध्ये स्थानिक विद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. दिंडीमध्ये सहभागी शाहीर, भजनी मंडळी यांनी भजन, लोकगीतातून वृक्षलागवडीचा संदेश दिला.
‘रोपे आपल्या दारी’ उपक्रम
वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘रोपे आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन व वन वसाहत येथील परिसरातील रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील वृक्षप्रेमींसाठी मेडशी, वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथे सुलभरित्या रोपांची उपलब्धता होण्यासाठी वन विभागाच्यावतीने ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत रोपे विक्री केंद्र उभारण्यात आल्याचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ यांनी सांगितले.