मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:22 PM2019-10-02T21:22:02+5:302019-10-02T21:25:31+5:30

वेळेच्या बंधनाचे पालन होत असल्याने ध्वनिप्रदुषणाच्या जाचातून नागरीकांची सुटका

Police voice this year in Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच

मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच

Next
ठळक मुद्दे रात्री १० नंतर ध्वनिप्रदुषण करणाऱ्या ध्वनिक्षेपक वा ध्वनियंत्रणांसह आयोजकांवर कारवाई करतानाच गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरु लागली.काही ठिकाणी आयोजक मुजोरी करत असल्याने त्या ठिकाणी पोलीसच तैनात करण्यात आले आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त आयोजित नृत्यासाठी कायद्याने ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री १० च्या वेळेची पोलीसांकडून अंमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलीसांचाच असल्याचे चित्र आहे. १० ते सव्वा दहा दरम्यान बहुतांश मोठे आणि व्यावसायीक आयोजकांचे कार्यक्रम बंद होत असल्याने नागरीकांनी ध्वनी प्रदुषणाच्या जाचातुन सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तर कार्यक्रम लवकर बंद होत असल्याने तरुण व शाळकरी मुलं घरी लवकर परतत असल्याने पालकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे.

शहरात नवरात्रला सुरवात झाली असुन विधानसभा निवडणुका असल्याने नवरात्रीला राजकिय रंग आला आहे. राजकारणी व लोकप्रतिनिधीं मध्ये गरबा आयोजनासाठी वेगवेगळे गायक व कलाकार आणणे, बक्षिसं यात स्पर्धाच लागली आहे. आॅर्केस्ट्रा साऊंड, डिजे सारख्या कानठळ्या बसवणारया ध्वनियंत्रणांचा दणदणाट चालला आहे. उमेदवार व त्यांचे समर्थक नवरात्रीच्या आड आपला प्रचार - प्रसार करण्याचा शक्यतो खटाटोप करताना दिसत आहेत.

वास्तविक ध्वनी प्रदुषण नियम २००० व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशां मुळे आवाजा वर नियंत्रण आणण्यात आले आहे. रात्री १० पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी असली तरी त्या नंतर देखील सर्रास ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवले जात असल्याचा अनुभव आहे. पोलीस फक्त येऊन समज देऊन गेले की पुन्हा मंडळवाले ध्वनिक्षेपक सुरु करतात.

कानठळ्या बसवणारया आवाजाच्या वाढत्या पारया मुळे सर्वसामान्य नागरीक त्रासले आहेत. ज्येष्ठ नागरीक, रुग्ण, लहान मुलं यांना तर आवाज जाचक ठरतोय. विद्यार्थी व कामावर जाणारया बहुसंख्य नागरीकांना सुध्दा झोप पुर्ण होत नसल्याने त्रास सहन करावा लागतोय. निदान रात्री १० वाजता ध्वनिक्षेपक बंद होईल अशी त्यांची आशा असते. यंदाच्या नवरात्रीला देखील सुरवातीला तसा अनुभव आला होता. पण ध्वनिप्रदुषणाने होणाराया त्रासाने वैतागलेल्या जागरुक नागरीकांनी ध्वनिप्रदुषणा बाबत तक्रारी चालवल्या. पोलीसांनी स्वत:हून गस्त घालून रात्री १० नंतर ध्वनिप्रदुषण करणाऱ्या ध्वनिक्षेपक वा ध्वनियंत्रणांसह आयोजकांवर कारवाई करतानाच गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरु लागली.

यंदा मात्र पोलीसांनी ध्वनिप्रदुषणाने त्रासलेल्या वृध्द, रुग्ण, विद्यार्थी, लहान मुलं आदी नागरीकांना सुखद धक्का देतनाच मोठा दिलासा दिला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ध्वनिप्रदुषणाचा वाढता धोका आणि सामान्य नागरीकांना होणारा त्रास पाहता पोलीसांनी रात्री १० वाजता ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद बंद करण्याचे आदेश दिले होते. ठाणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी देखील पोलीस अधिकारायांच्या क्राईम बैठकीत ध्वनि प्रदुषण रोखण्यासह वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठांच्या आदेशां मुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारायांनी देखील कोणाचा मुलाहिजा न ठेवता वेळेची मर्यादा पाळण्याची कार्यवाही चालवली आहे. काही ठिकाणी आयोजक मुजोरी करत असल्याने त्या ठिकाणी पोलीसच तैनात करण्यात आले आहेत.

अनंत आंगचेकर ( ज्येष्ठ नागरीक, भाईंदर ) - यंदा पोलीसांनी स्वत:हुन ध्वनि प्रदुषण नियमांचे काटेकोर पालन करायला लावल्याने माझ्या सारख्या ज्येष्ठ नागरीकांसह रुग्ण, मुलं महिला व नागरीकांना दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे १० वाजता कार्यक्रम बंद होत असल्याने घरातील लहान तसेच तरुण मुलं - मुली लवकर घरी परतत असल्याने पालकांच्या जीवाला लागणारा घोर यंदा मिटला आहे. त्या बद्दल पोलीसांचे आभार.
 

 

जागृती प्रशांत केळकर (गृहिणी, भाईंदर ) - नवरात्रीचे धार्मिक पावित्र्य राहिलेले नाही. केवळ मौजमजा चालली आहे. नवरात्रीच्या नावाने मुलं - मुली रात्री उशीरा पर्यंत नाहक फिरत राहतात ते बंद झालेच पाहिजे. पोलीसांनी देखील रात्री उशीरा मुलं - मुली दिल्यास सरळ त्यांना घरी पाठवले पाहिजे. ध्वनिक्षेपकची रात्री १० ची वेळ काटेकोर पाळली जावी. आवाजाची पातळी देखील तपासली जावी. १२ वाजे पर्यंतची सवलत बंद करावी. वाटल्यास शेवटचाच एक दिवस द्यावा.

Web Title: Police voice this year in Mira Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.