नगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:23+5:30
मागील दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नाही, असे म्हणून सुनील चावरे यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नीलेश नंदनवार यांच्याशी वाद केला. सुरूवातीला सुरू असलेली शाब्दिक चकमक अचानक विकोपाला गेली. दरम्यान सुनील चावरे यांनी सर्वप्रथम कार्यालयातील सीसीटीव्ही तोडला. त्यानंतर चावरे यांनी नंदनवार यांना मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करीत माजी नगराध्यक्षाचा मुलगा डॉ. सुनील चरणसिंग चावरे यांनी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नीलेश नंदनवार यांना त्यांच्या दालनात मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या दालनातील टेबलही फेकून दिला. तर परिसरात वेळीच कचरा गोळा करणारी घंटागाडी येत नसल्याचे कारण पुढे करून भाजप नगरसेवक कैलास राखडे यांनी आरोग्य निरीक्षक नवीन गोंडाणे यांना मारहाण केली. या दोन्ही घटनांमुळे चांगलीच खळबळ उडाली असून शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ वर्धा नगर पालिकेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.
डॉ. सुनील चावरे यांचे वडील दिवंगत चरणसिंग चावरे यांनी यापूर्वी वर्धा न.प.ची नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर सध्या डॉ. सुनील चावरे यांची आई भाजपची नगरसेविका आहेत. मागील दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नाही, असे म्हणून सुनील चावरे यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नीलेश नंदनवार यांच्याशी वाद केला. सुरूवातीला सुरू असलेली शाब्दिक चकमक अचानक विकोपाला गेली. दरम्यान सुनील चावरे यांनी सर्वप्रथम कार्यालयातील सीसीटीव्ही तोडला. त्यानंतर चावरे यांनी नंदनवार यांना मारहाण केली. इतक्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी कार्यालयातील टेबलही फेकला. शिवाय शासकीय साहित्याचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तर आरोग्य निरीक्षक नवीन गोंडणे यांना भाजपचे नगरसेवक कैलास राखडे यांनी कचरा गोळा करणारी घंटागाडी वेळीच येत नाही, असे सांगितले. त्यांची समस्या लक्षात घेऊन ती सोडविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कैलास राखडे यांनी आरोग्य निरीक्षक नवीन गोंडाणे यांना मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्हीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
पोलीस कचेरीसमोर नोंदविला निषेध
सदर दोन्ही घटनांची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनांची माहिती मिळताच न.प.च्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर न.प.च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी घोषणाबाजी करून घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी न.प.चे प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, रवींद्र जगताप, सुधीर फरसोले, गजानन पेटकर, नाना परटक्के, निखिल लोहवे, सुजीत भोसले, अशोक ठाकूर, चेतन बगमारे, विशाल सोमवंशी, शंतनू देवईकर, अश्विनी धोंगडे, सारिका सबाने, लता चामटकर, त्रिवेणी डायगव्हाणे, जया भोयर, चंदोरिया, प्रवीण बोबडे, शिवाजी थोरात आदींची उपस्थिती होती.
आरोपींवर कठोर कारवाई करा; अन्यथा पाणी पुरवठा बंद ठेवू
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही घटना घडल्याने पालिकेच्या अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांवर दडपशाहीचा अवलंब होत असल्याचे दिसून येत आहे. समस्या चर्चेतून सुटते.
तसेच मारहाण करणे हा प्रकार निंदनिय असून दोन्ही प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या न.प.च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आहे. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास वर्धा शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवू.
शिवाय कामबंद आंदोलन कायम ठेवू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी या आंदोनाच्या माध्यमातून दिला आहे.