'शक्तिपीठ'ची मोजणी पूर्ण आता भूसंपादनाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:49 IST2026-01-18T11:48:54+5:302026-01-18T11:49:28+5:30
पवनार ते पत्रादेवी : महामार्गाची लांबी ८४० किलोमीटरपर्यंत वाढली

'शक्तिपीठ'ची मोजणी पूर्ण आता भूसंपादनाची प्रतीक्षा
वर्धा : पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या सांगलीपर्यंतच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार जवळपास १५० पेक्षा जास्त गावांतील जमीनमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. आता जमीन संपादनाची प्रतीक्षा लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील शक्तिपीठ महामार्गाची आखणीची अधिसूचना रद्द केली होती. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटी आणि त्यावरील संभाव्य व्याज ८ हजार ७८७ कोटी, असे एकूण २० हजार ७८७ कोटी रुपयांनाही मंजुरी मिळाली होती. प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या आखणीचे कामही 'एमएसआरडीसी'कडून पूर्ण झाले आहे.
मार्गात थोडा बदल झाला
हा मार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. त्याची लांबी ८०२ किलोमीटर असणार आहे. मात्र, आता या मार्गात सातारा जिल्ह्यातील काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे, कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातून हा मार्ग वळवण्यात आला आहे. महामार्गाची लांबी ८४० किलोमीटर होण्याची शक्यता आहे.
३७० गावांमधून जाणार
शक्तिपीठ महामार्ग, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ३९ तालुके, ३७० गावांतून जाणार आहे. या मार्गाला १८ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहे. एमएसआरडीसीने वर्धा ते सांगलीदरम्यानच्या १५० गावांतील जमिनीची मोजणी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित गावांची मोजणी पूर्ण होताच भूसंपादन सुरू होईल.
तीन शक्तिपीठे जोडणार
माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर, ही राज्यातील तीन शक्तिपीठे या मार्गाने जोडली जाणार आहे. याशिवाय परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर, नरसोबाची वाडी अशी काही धार्मिक स्थळे या महामार्गाने जोडली जातील.